जादूटोणाविरोधी कायद्यान्वये आतापर्यंत संपूर्ण राज्यात १३ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील तीन गुन्हे अल्पसंख्याक, तर पाच गुन्हे इतर समाजाशी निगडीत आहे. त्यामुळे हा कायदा केवळ हिंदु धर्माच्या विरोधात असल्याचा आक्षेप घेणे योग्य नाही, असे मत अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी आणि सूत्रधार यांना अटक करावी, जादूटोणा विरोधी वटहुकूम मंजूर करावा आणि सनातनी, धर्माध व मूलतत्ववादी शक्तींचा शासनाने प्रतिकार करावा, या मागण्यांसाठी अंनिसच्यावतीने मंगळवारी जादुटोणाविरोधी कायदा मंजुरी निर्धार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर करताना राज्य शासनाची नैतिकता व राजकीय इच्छाशक्तीची कसोटी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जादूटोणा विरोधी कायदा मंजुरी निर्धार मोहिम राज्यातील ३३ जिल्ह्य़ांत आयोजित केली जात आहे. त्या अनुषंगाने कायदा व अंधश्रध्दा निर्मूलनाच्या जनजागृतीपर साहित्याचे वितरण तसेच सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची भेट घेतली जात आहे. या मोहिमेंतर्गत २ डिसेंबर रोजी मुंबईत राज्यातील सर्व परिवर्तनवादी पक्ष, संघटना, संस्था यांच्या सहभागाने मोर्चा आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदानावर ही सभा होईल. हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होणे अपेक्षित असल्याचे हमीद दाभोलकर यांनी नमूद केले. अंनिसने राबविलेल्या जात पंचायत मुठमाती अभियानामुळे न्यायालयाने राज्य शासनाला या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे तयार करण्याचे सूचित केले आहे. जात पंचायतीविरुद्ध तक्रारी नोंदविण्यासाठी गृह विभागाने प्रत्येक पोलीस ठाण्यास कोणकोणत्या कलमांन्वये गुन्हा दाखल करता येईल याची माहिती दिली आहे. जात पंचायतींशी संवाद साधून त्यांच्या चांगुलपणाला साद घालण्याची अन् दुसरीकडे कायद्याचा धाक दाखविण्याची कार्यपध्दती अनुसरण्यात आली असल्याचे अंनिसच्या इतर पदाधिकाऱ्यांना सांगण्यात आले. जात पंचायतीला मुठमाती अभियान पुढेही सुरु राहणार आहे.

धर्माधिष्ठीत अभ्यासक्रमांना विरोध
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सुरू केलेल्या धर्माधिष्ठीत अभ्यासक्रमांना अंनिसने आधीच विरोध नोंदविला आहे. शिक्षणाचे धार्मिकीकरण होऊ नये, अशी अंनिसची भूमिका आहे. उपरोक्त प्रकरणात शिक्षण आणि धार्मिकता यांची गल्लत तर केली जात नाही ना, याची छाननी केली जात असल्याचे दाभोलकर यांनी सांगितले.