राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापलेलं आहे. विरोधकांकडून या मुद्य्यावरून राज्य सरकारवर टीका सुरू आहे. शिवाय राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दोन्ही छत्रपतींनी भूमिका घेतलेली आहे. संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनी सगळ्यांनी जी भूमिका घेतली आहे, त्याचं मी स्वागत करते. ज्या पद्धतीने सातत्याने भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष जी पाठराखण अशा लोकांची करताय, त्याचा मी जाहीर निषेध करते. मला असं वाटतं राजकारण कधीतरी ठेवून स्वत:चा स्वाभिमानासाठी आणि ज्या छत्रपतींचं नाव घेऊन महाराष्ट्राची वेगळी ओळख आहे. जो आपला श्वास आहे, ध्यास आहे आपला आदर आहे, ओळख आहे. त्यांच्या मानसन्मासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. मी राज ठाकरेंचंही भाषण ऐकलं. याचंही मी स्वागत करते, त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आपण सगळ्यांनी लढण्याची गरज आहे.”

हेही वाचा – “राजकारण म्हणजे मिमिक्री नाही, आपण आता…”; राज ठाकरेंच्या टीकेला संजय राऊतांकडून प्रत्युत्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय, “महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी घसरते आहे, त्याबद्दल सगळ्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मी अनेकदा आमच्या विरोधकांनाही विनंती केली आहे, की आपण सगळे एकत्र मिळून महाराष्ट्राची एक वेगळी संस्कृती आहे जी अनेक दशकं आपल्या ज्येष्ठांनी जपलेली आहे. ती कुठेतरी ढासळताना दिसते आहे, सुसंस्कृत पणा जो आधी होता तो परत आणण्याचा प्रयत्न करूयात.” असंही यावेळी सुळेंनी म्हटलं आहे.