सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कारकिर्दीमध्ये भ्रष्टाचारामुळे राज्यातील २०० सहकारी साखर कारखान्यांपैकी १०१ साखर कारखाने मृत्युपंथाला लागले असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी सांगलीत केला. भाजपचे उमेदवार आ. सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत गृहमंत्री शहा बोलत होते. या वेळी आमदार गाडगीळ यांच्यासह पालकमंत्री सुरेश खाडे, संजयकाका पाटील, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. पद्माकर जगदाळे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

या वेळी मंत्री शहा म्हणाले, ‘सांगलीत आशिया खंडातील सर्वांत मोठा वसंतदादा सहकारी साखर कारखाना उभारला होता. मात्र, तोही विकण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या कारकिर्दीत झाला. सहकारातील संस्था कोणी आणि कशासाठी मोडल्या, याचे उत्तर पवार यांनी द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र सहकारी साखर कारखान्याच्या साखरेवरील प्राप्तिकर हटवून शेतकऱ्यांना १५ हजार कोटींचा फायदा दिला आहे.

हेही वाचा >>> काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी डझनभर इच्छुक – अमित शहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात २००४ ते २०१४ या कालावधीत आघाडीचे सरकार असताना केंद्रात मनमोहनसिंग यांचे सरकार होते. या १० वर्षांच्या कालावधीत केंद्राकडून राज्याला १ लाख ९१ हजार कोटी मिळाले. मात्र, केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गेल्या दहा वर्षांत राज्याला १० लाख १५ हजार ९०० कोटी रुपये देण्यात आले. देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून पाचव्या स्थानी आली असून, २०२७ मध्ये ती तिसऱ्या स्थानी येईल. मोदी सरकारच्या काळात दहशतीवादी हल्ले कमी झाले असून, देशाच्या सीमा सुरक्षित हाती आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लाल कव्हरमध्ये संविधानाचे वाटप केले. मात्र, यामध्ये आत कोरी पानेच आहेत. यामुळे संविधानाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान त्यांनी केला आहे. कोणीही संविधान बदल करू शकणार नाही, असा विश्वास त्यांनी या वेळी दिला. तर एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण कोणत्याही स्थितीत हटवले जाणार नाही, असे सांगत त्यांनी सांगलीला लवकरच विमानतळ होईल, असे आश्वासन या वेळी दिले.