Maharashtra Cabinet Expansion : राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभेचं तीन दिवसांचं विशेष अधिवेशन देखील पार पडलं. या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. मात्र, आता सरकार स्थापन होऊन पाच दिवस होऊन गेले आहेत. मात्र, तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? याबाबत विरोधकांकडून अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

तसेच एकनाथ शिंदे हे गृहखात्यासाठी आग्रही आहेत. पण गृहखात शिवसेनेला देण्यास भाजपा तयार नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेही मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी यावर भाष्य करत मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला आहे? आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का झाला नाही? मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास वेळ का लागत आहे? या मागची कारणं संजय शिरसाट यांनी सांगितली आहेत.

हेही वाचा : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?

संजय शिरसाट काय म्हणाले?

मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत जाणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर यादी दिल्लीत फायनल होणार असल्याची चर्चा आहे. मग नेमकं मंत्रिमंडळाचा विस्तार कधीपर्यंत होईल? आणि आतापर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडला? या मागचं कारण काय? असं संजय शिरसाट यांना विचारलं असता ते म्हणाले की, “राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष. मग या तीनही पक्षांमध्ये खाते वाटप असेल किंवा कोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कोणाला नाही घ्यायचं? हे ठरवण्याचा प्रश्न महायुतीमधील तिन्ही नेत्यांचा आहे. अनेक आमदार असतात, मग त्यामधून काहींची निवड करणं हे अवघड काम असतं. तसेच पक्षातील नेत्याला पाहावं लागतं की, एखाद्या आमदाराला नाराज करायचं का? एखाद्याला मंत्रिमंडळात ठेवायचं की नाही. असे प्रश्न असतात. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराला वेळ लागतो”, असं कारण संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार?

“तसेच मंत्रिमंडळाची यादी दिल्लीत गेली आहे की नाही? याची माहिती मला नाही. मात्र, पुढील तीन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं की, हिवाळी अधिवेशनाच्या आधी होईल. त्यामुळे १३ डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार करावा लागेल. कारण १५ डिसेंबरला नागपूरला जावं लागेल. कारण १६ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन सुरु होईल. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार १३ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता नाकारता येत नाही”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.