राहाता: क्षेत्रीय स्तरावरील समितीने छाननी केल्यानंतरच कुणबी प्रमाणपत्राचे वाटप मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रातिनिधिक स्वरूपात करण्यात आले आहे. बोगस दाखल्यांच्या आधारे कुणालाही प्रमाणपत्र न देण्याच्या सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून, तरीही बोगस दाखल्यांच्या आधारे ते दिल्याचे जात पडताळणी समितीच्या लक्षात आले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जलसंपदा तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी दिला.
शिर्डीत गुरुवारी माध्यमांशी बोलताना विखे म्हणाले, कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप घेतला आहे. बोगस दाखल्यांच्या आधारे अशी जात प्रमाणपत्रे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशी बोगस दाखल्यांच्या आधारे प्रमाणपत्र वाटप झाल्याचे लक्षात आल्यास ती तत्काळ रद्द होतील. तसेच यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही सरकारची भूमिका आहे आणि भुजबळ यांनीसुध्दा तीच मागणी केली आहे. मराठा समाजाच्या संघटनांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या परिषदेच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांच्याकडून काही सूचना आल्यास त्याचे स्वागत करू असे स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांच्या चलो दिल्ली घोषणेवर भाष्य करताना विखे यांनी सांगितले की, त्यांचे दिल्लीत जाणे हे मराठा अधिवेशनाच्या निमिताने असावे. अधिवेशन सरकारच्या विरोधात नाही. सरकारने घेतलेल्या निर्णयावर जरांगे पाटील समाधानी असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यासंदर्भात कर्नाटक सरकारने परस्पर पावले उचलली तर राज्य सरकार न्यायालयात अवमान याचिका दाखल करेल, अशी भूमिका विखे यांनी मांडली.
राहुल गांधी यांची मुक्ताफळे
निवडणूक आयोगावर टीका करण्याची राहुल गांधी यांची फक्त नौटंकी सुरू असून, हा बालिशपणा करण्याऐवजी त्यांनी शिल्लक राहिलेली पक्षाची प्रतिमा सांभाळावी, असा सल्ला मंत्री विखे यांनी गांधी यांना देत, ज्यांना मतदारयाद्यांवर आक्षेप आहेत, ते लोक इतक्या दिवस काय करीत होतेॽ खासदार राहुल गांधी यांनी यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले. आयोगाने त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले ते का देत नाहीत. त्यांचे फक्त मुक्ताफळे उधळण्याचे काम सुरू असल्याची टीका करून मतदारयाद्यांची काही प्रक्रिया असते. उगाच काही कुरापती काढून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. अशा प्रकारामुळेच काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालल्याचे विखे यांनी म्हणाले.