Maharashtra Weather Updates, 28 July 2023 : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबईतल काल (२७ जुलै) रेड अलर्ट जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, मुंबईत तुफान पाऊस झाला. आज दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला असून यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अतिमहत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, दुसरीकडे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल सावित्री बाई फुले, गडचिरोली येथील छप्पर उडालेली एसटी बस आदी मुद्दे गाजले. आज कोणत्या मुद्द्यांवरून सभागृहात खडाजंगी होते हे पाहावं लागणार आहे. यासह राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा.
Live Marathi News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा
मुंबईत होणाऱ्या INDIA या विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक होणार आहे. ही बैठक चांगल्या पद्धतीने करता यावी, याचं मार्गदर्शन शरद पवारांनी आज केलं. फोनवरून ते ठाकरेंशीही बोलले. पुढच्या शनिवारी सकाळ, ११ वाजता पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, नेते असे १०० च्या वर महत्त्वाचे नेते मुंबईत येणार असल्याचा अंदाज आहे. त्यांच्या पूर्वतयारीसाठी आज काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांसह बैठक घेतली होती - नाना पटोले
"दादा भुसे यांनी १७८ कोटींचा घोटाळा केला. यांनी क्लिनचिटचा कारखानाच उघडला आहे. अब्दुल सत्तारांनी घोटाळा केला. मी म्हणालो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकने साडेचार कोटींची मदत केली. इक्बाल मिर्ची, दाऊद इब्राहिम यांच्याकडून काही व्यवहार झाल्याने आमचे काही लोक तुरुंगात आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप झाल्यानंतर ईडीने कारवाई केली, ते आता मोठे झाले. नवाब मलिक तुरुंगात आहेत. मग झाकिर नाईक यांच्याकडून पैसे मिळालेल गृहस्थ मंत्रिमंडळात कसे? विखे पाटील स्वतः सांगतात की चार कोटी नाही अडीच कोटीच मिळालेत", असं संजय राऊत म्हणाले.
राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात थांबता थांबत नाहीत. यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अचानक टायर फुटल्याने बस रस्त्यालगतच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन आदळली. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावानजीक घडली.
राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसचे अपघात थांबता थांबत नाहीत. यामुळे आता प्रवाशांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अचानक टायर फुटल्याने बस रस्त्यालगतच्या थेट शेताच्या बांधावर जाऊन आदळली. ही दुर्घटना शुक्रवारी सकाळी मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा-काकोडा गावानजीक घडली. अपघातात नऊ प्रवासी जखमी झाले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी ठाण्यात येणार आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी हिंदी भाषिक कार्यकर्ता संमेलनाचे आयोजन गडकरी रंगायतन येथे केले आहे.
विधान परिषद दिवसभरासाठी स्थगित, आता पुढील कामकाज बुधवारी होणार; नीलम गोऱ्हे यांची माहिती
जिल्ह्याच्या सीमेवरील सातपुडा पर्वतरांगेत काल रात्री पुन्हा मुसळधार पाऊस झाला. यामुळे तीन नद्यांना पूर आल्याने अनेक मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे गावातील ग्रामस्थांनी रात्र जागून काढली. संग्रामपूर पट्ट्यात दोनेक तास झालेल्या कोसळधारने पदमावती, लेंडी व पांडव नदीला पुर आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपच्यावतीने महाजनसंपर्क अभियान राबविले जाणार आहे. मतदान केंद्रस्तरीय रचना सशक्त व्हावी, यासाठी संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी झोकून द्यावे व समाजातील सर्व घटकांची सर्वसमावेशक मतदान केंद्रस्तरीय रचना करावी.
‘सुरक्षित प्रवास व रस्ता सुरक्षा’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या दोन संदेशाचा जगभरात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नवी मुंबईतील रहिवासी योगेश अलेकरी यांनी मुंबई – लंडनदरम्यानचा २५ हजार किमी प्रवासाला सुरुवात केली आहे.
निवासी, बिगरनिवासी, मोकळ्या जागेचा कर भरण्यासाठी चार दिवस बाकी असल्याने अधिकाधिक नागरिकांना कर भरता यावा, यासाठी शनिवार आणि रविवारी (२९ आणि ३० जुलै) महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत सुरू राहणार आहेत.
गेल्या २४ तासात सर्वाधिक पाऊस झालेले पाच जिल्हे
पालघर - १५६.१ मिमी
ठाणे - १४०.४ मिमी
मुंबई उपनगर - ११९ मिमी
मुंबई शहर - ११६ मिमी
रायगड - ९२ मिमी
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई महानगरात पावसाचा जोर वाढला असून पावसामुळे गुरुवारी लोकलचा खोळंबा झाला होता. काही मिनिटांच्या प्रवासासाठी तासभर लागत होता. तर शुक्रवारी मध्य रेल्वेवरील उंबरमाळी – कसाऱ्यादरम्यान डाऊन दिशेला जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला.
वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे सिंहगड रस्ता वाहतूक कोंडीत सापडल्याचे चित्र आहे. उड्डाणपुलाच्या कामामुळे रस्त्याची अक्षरक्ष: चाळण झाली असून पर्यायी कालवा रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. पर्यायी रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत असून एक ते दीड किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तासाचा कलावधी लागत आहे.
वर्षभरापूर्वी फेसबुकवर फ्रेंड्सशिप झाली आणि त्यातूनच अल्पवयीन मुला-मुलीचे एकमेकांवर प्रेम जडले, प्रेमात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले. मुलीला खासगी रुग्णालयात आणल्यावर ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात आले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रस्तावित केलेल्या वर्तुळाकार रस्त्याला कोणत्याही प्रकारची स्थगिती मिळालेली नाही, अशी स्पष्टोक्ती जिल्हा प्रशासनाकडून गुरुवारी करण्यात आली. तसेच भूसंपादन प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.
डपसर, तसेच वानवडी भागातील गुन्हेगारांना चाप बसविण्यासाठी पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी या भागातील ६५ गुंडांना पुणे शहर, जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले. एकाचवेळी ६५ गुंडांना हद्दपार करण्यात आल्याने गुंडांना जरब बसणार आहे.
फॅटी लिव्हर रोगाचे निदान होईल लवकरात लवकर होणे आवश्यक असते. त्यामुळे वेळीच उपचार सुरू होऊ शकतात. या रोगाचे योग्य वेळी निदान न झाल्यास यकृताला अधिक इजा होऊन गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अचानकपणे पचनाशी संबंधित समस्या उद्भवल्यास तत्काळ तज्ञांचा सल्ला घेऊन तपासणी करुन घ्यावी, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे.
नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी येथील पादचारी भुयारी मार्गाच्या कामाची मुदत संपूनही काम पूर्ण झालेले नाही. या मार्गाचे आतापर्यंत केवळ तीस टक्केच काम झाले असून, नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.
जागतिक कीर्तीचे अभियंता आणि उद्योगपती सुधाकर श्रीरंग प्रभू (वय ८७) यांचे लंडन येथे नुकतेच निधन झाले. प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू या त्यांच्या पत्नी होत. प्रभू यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. सुधाकर प्रभू हे मूळचे कोकणातील खानोली गावचे होते.
बुलढाणा अपघाताच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते पूणे रेल्वे गाड्यांच्या संख्येत वाढ करण्याची मागणी खासदार रामदास तडस यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना भेटून केली आहे. दिल्ली येथे झालेल्या या भेटीत तडस यांनी बुलढाणा जिल्ह्यात समृध्दी महामार्गावर झालेल्या अपघाताची माहिती रेल्वेमंत्र्यांना दिली.
भूमी अभिलेख कार्यालयातील कामांसाठी पिंपरी-चिंचवडकरांची हवेली कार्यालयात होणारी पायपीट थांबविण्यासाठी महापालिका हद्दीतील गावांचा समावेश हवेली कार्यालयाऐवजी पिंपरी-चिंचवड भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली.
मेट्रोच्या विस्तारित मार्गांना मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १ ऑगस्टला होण्याची केवळ औपचारिकता शिल्लक राहिली आहे. या उद्घाटन कार्यक्रमासाठी वरिष्ठ पातळीवर नियोजनाच्या जोरदार हालचाली सुरू आहेत, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.
मुळा नदी पुनरूज्जीवन प्रकल्पासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्या कर्जरोख्याद्वारे २०० कोटी रुपये मिळविले आहेत. या प्रकल्पांसाठी गुंतवणूकदारांकडून ३१५ कोटी रुपयांच्या बोलीसह उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुंबई शहर, उपनगरे तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये बुधवारी पहाटे सुरू झालेला पाऊस गुरुवारीही कायम होता. मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले आणि वाहतूक मंदावली. पावसाचा रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला.हवामान विभागाने आज, शुक्रवारीही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून मुंबई तसेच ठाण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Marathi News Today : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा