Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत आपली भूमिका मांडल्यानंतर बंडखोर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी पत्राच्या माध्यमातून यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विटरला हे पत्र शेअर केलं आहे. यामध्ये संजय शिरसाट यांनी आमदारांच्या भावना व्यक्त केल्या असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते भावनिक होतं. पण त्यात आमच्या मूळ प्रश्नांची उत्तरं कुठे मिळालीच नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे पत्र लिहिलं असल्याचं आमदारांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रात काय म्हटलं आहे –

“काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती,” अशी नाराजी संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

“आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश कऱण्यासाठी आम्हाला तुमच्या आजुबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनीती ठरवत होती. त्याचा निकाल काय लागला हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे.” असं संजय शिरसाट पत्रात म्हणाले आहेत.

Maharashtra Political Crisis Live : गटनेतेपदासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं पत्र स्विकारलं, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांची माहिती; वाचा प्रत्येक अपडेट…

“मतदारासंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्ही बोलावलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन उचलायचे नाहीत. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो,” असं त्यांनी सांगितलं आहे.

तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे? असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

“जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे…,” बंडखोर आमदारांवर संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले “बाळासाहेबांचे भक्त नाहीत”

“हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही. किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचलीसुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. मतदारसंघात असलेली वाईट परिस्थिती, मतदारसंघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान, आमची सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही हा निर्णय घेण्यास घ्यायला लावला,” असं संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

“हिंदुत्व, अयोध्या, राम मंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असं सांगितलं. मुंबई विमानतळावरुन अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते. आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करुन सांगितलं, की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता. आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतलं आणि आपलं घर गाठलं. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हतं मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वसा का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?,” अशी विचारणा संजय शिरसाट यांनी केली आहे.

“साहेब, जेव्हा आम्हाला वर्षावर प्रेवश मिळत नव्हता तेव्हा खरे विरोधक काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमति भेटत होते. मतदरासंघातली काम करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटनं करत होते. तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदारसंघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो?,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

“त्यांची काम कशी होतात? तुम्ही आम्हाला भेटतच नव्हता तर आम्ही मतदारांना उत्तर काय घ्यायचं या विचाराने जीव कासावीस व्हायचा,” अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

“या सर्व कठीण प्रसंगात शिवसेनेचं, माननीय बाळासाहेबांचं, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं हिंदूत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठीण प्रसंगात त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते. आजही आहेत आणि उद्याही राहतील या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत,” असं त्यांनी सांगितलं आहे.

“काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत. त्यामुळे आमच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे भावनिक पत्र लिहावं लागलं,” असं त्यांनी शेवटी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra political crisis shivsena sanjay shirsat eknath shinde mla letter cm uddhav thackeray sgy
First published on: 23-06-2022 at 12:44 IST