Mumbai Maharashtra Weather Forecast : पश्चिम महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असताना मुंबईत मात्र पावसाने दडी मारली होती. मात्र, रविवारी सायंकाळपासून पावसाने मुंबई, ठाणे, कल्याण, वसई भागात जोर धरला आहे. दरम्यान, सोमवारी दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. हवामान विभागाचा अंदाज अचूकठरला असून आज (१६ जून) सकाळपासूनच मुंबईसह ठाणे, रायगड व पालघर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस चालू आहे. या पावसाने मुंबई लोकल वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही. मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वे ५ ते १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

दरम्यान,वसई-विरार भागात रविवारी संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस चालू असून शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झालं आहे.

कोकण व उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने मुंबई शहर व उपनगरांमध्ये रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईला यलो अर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते असं हवामान विभागने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, आहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर झाला आहे. तर धुळे व नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नसला तर या भागात पावसाचा जोर दिसून येईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. पुणे, सातारा व कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विदर्भ व मराठवाड्याला यलो अलर्ट

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली व परभणी या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाण्याचा समावेश आहे.