सातारा: राज्यात मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, अशा परिस्थितीत रस्त्याची तातडीने देखभाल व दुरुस्ती करण्याची गरज लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील रस्त्यांच्या वार्षिक देखभाल व दुरुस्ती कार्यक्रमासाठी यावर्षी १२९६.०५ कोटी रुपये निधीस मंजुरी दिली आहे. राज्यात ४३०४३.०६ किलोमीटरचे रस्त्यांवरील खड्डे टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, की रस्ते हे एक प्रकारे राज्याच्या विकासाच्या प्रगतीच्या वाहिन्या आहेत. सुरक्षित दर्जेदार आणि खड्डे मुक्त रस्ते निर्माण करण्याला सरकारचे प्राधान्य आहे. या निधीच्या मंजुरीमुळे तातडीची दुरुस्ती कामे तर होणार आहेतच, शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या कामांमध्ये पारदर्शकता आणली जाणार आहे. त्यामुळे खड्डे मुक्त सुरक्षित आणि टिकाऊ रस्ते उपलब्ध होतील. या निधीच्या उपलब्धतेमुळे राज्यातील रस्त्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.
रस्त्यांवरील खड्डे भरणे, पावसामुळे बाधित झालेल्या मार्गाची तातडीची दुरुस्ती तसेच पूरक कामे हाती घेण्यासाठी ही रक्कम उपयोगात आणली जाणार आहे. प्रत्येक विभागातील कामे वेळेत पूर्ण व्हावी यासाठी विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. रस्त्यांची दुरुस्ती वेळेत व दर्जेदार व्हावी यासाठी शासनाने तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर आधारित ॲप द्वारे विकसित करण्यात आले आहे. रस्ते दुरुस्तीच्या निविदा लवकरात लवकरच काढून कामे सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचेही शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.