२५० वर्षांची परंपरा अखंडित सुरू

पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला महाशिवरात्रीनिमित्त गंगेच्या पाण्याने स्नान घातले जाते. विशेष म्हणजे राजमाता अहल्याबाई होळकर यांनी या प्रथेला सुरुवात केली. त्या नंतर होळकर संस्थानाचे प्रतिनिधी महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री १२ वाजता मंदिरात येऊन अभिषेक करायचे. मात्र मंदिरातील बडवे,उत्पात, सेवाधारी यांचे हक्क संपुष्टात आले. त्यामुळे गंगेच्या पाण्याचा कलश समितीकडे देऊन परंपरा जोपासतो, अशी माहिती येथील होळकर संस्थानचे व्यवस्थापक आदित्य उर्फ दादा फत्तेपूरकर यांनी दिली आहे. लाखो वारकऱ्यांचे आराध्य दैवत असलेला विठूराया हा शिव वैष्णवांचे प्रतीक मानले जाते. श्री विठ्ठलाच्या मस्तकी शिविलग आहे त्यामुळे  हरी हरा नाही भेद या अभंगाप्रमाणे येथे शिव आणि विष्णू हे एकच मानले जाते. तर वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. अशीच एक परंपरा आजही जोपासली जात आहे. राजमाता अहल्यादेवी होळकर या शिवभक्त होत्या. त्यांची विठ्ठलभक्ती सर्वश्रुत आहे.

अहल्याबाई यांनी महाशिवरात्री दिवशी गंगेच्या पाण्याचा महाभिषेक करण्यास सुरुवात केली. गंगा नदीचे उगम स्थान आलेल्या गंगोत्री येथून त्याकाळी कावडमधून आणली जात होती. महाशिवरात्रीला पंढरपूरचा पांडुरंग आणि देशातील १२ जोतिर्लिग अशा १३ ठिकाणी गंगेचे पाणी पोहोच करून अभिषेक करण्याची परंपरा राजमाता अहल्याबाई होळकर यांनी सुरु केल्याची माहिती दादा फत्तेपुरकर यांनी दिली. होळकर संस्थांचे प्रतिनिधी महाशिवरात्रीला मंदिरात येऊन रात्री १२ वाजता गंगेच्या पाण्याने सावळय़ा विठूरायाला अभिषेक करत होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने सन २०१४ रोजी श्री विठ्ठल मंदिरातील बडवे, उत्पात व सेवाधारी यांचे हक्क संपुष्टात आणले. त्यामुळे होळकर संस्थानच्या प्रतिनिधीचे हक्कदेखील संपुष्टात आला. मात्र पुढे त्यांनी एक कलश मंदिर समितीला दिला असून त्यातील जलाने अभिषेक केला जातो. विशेष म्हणजे १२ जोतिर्लिग व पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरास वर्षांतील महाशिवरात्रीनिमित्त हे जल पोहोचविण्याचे काम विविध ठिकाणातील ८ व्यक्तीवर ही जबाबदारी अहल्याबाई यांनी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्यक्तीने ज्या ठिकाणी जल देण्याचे ठरले आहे त्या ठिकाणी आजही पोहोच केले जाते. सुरुवातीला गंगेचे पाणी कावडमधून आणत होते. मात्र आता त्यात बदल करून एका कलशात पाणी आणले जाते. अहल्याबाई यांनी सुरु केलेली परंपरा आजही जोपासत आहोत आणि या माध्यमातून देवाची सेवा घडत आहे अशी भावना दादा फत्तेपूरकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, महाशिवरात्री निमित्त ७०० किलो बेलांच्या पानाची आकर्षक आरास करण्यात आली होती. या फुलांच्या आरासित देवाचे रूप अजून खुलून दिसून आले.