रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील नरवण गावात पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. मात्र हा पूर मानवनिर्मित असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. तसेच महावितरण वीज कंपनीने चुकीच्या पद्धतीने टाकलेल्या पाईपलाईन आणि रस्त्यांची गटारे विचारात न घेतल्यामुळे रस्ता वाहून गेला आणि संपूर्ण गावात पाणी शिरल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे.

नरवण या गावात पुराचे पाणी शिरण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असावी, असे येथील ग्रामस्थांनी सांगितले. ८० वर्षांचे वृद्ध जोडपे, विश्राम आजोबा आणि सावित्री आजी, त्यांच्या घरात पाण्याचे लोट शिरल्याने भयभित झाले होते. गावातील अनेक लोकांच्या घरात पाणी शिरल्याने गुडघाभर माती व चिखल रस्त्यात आणि बाजारपेठेत राहणाऱ्या लोकांच्या घरात जमा झाला. नरवणच्या मुख्य रस्त्यावर डोंगरातून दगड येऊन पडले आहेत. या पुराबद्दल ग्रामपंचायतीला पूर्वसूचना देण्यात आली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वीज कंपनीची भूमिगत पाईपलाईन आजूबाजूच्या कातळ, डोंगर आणि नाल्यांचा विचार न करता टाकण्यात आली होती. तसेच वादळ नियंत्रणासाठी आलेला निधीही परिसंस्थेचा विचार न करता वापरण्यात आला. ज्यामुळे कातळाचे पाणी वाहून गावात घुसले. त्यावेळी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी या कामासाठी आपली परवानगी घेतली नसल्याचे कळविले. असे असतानाही वीज कंपनी, एअरटेल आणि जिओ च्या पाईपलाईन्स इतक्या घाईघाईने का टाकण्यात आल्या ? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावात अनेक ठिकाणी झालेली जंगलतोडही या पूरस्थितीला कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. जंगलतोडीमुळे माती धरून ठेवायला काहीही नसल्यामुळे, डोंगराचे पाणी थेट गावात आले. या निष्काळजीपणामुळे एक बंधाराही वाहून गेला आहे. आता पुन्हा नवीन दोन ते तीन बंधारे बांधण्यात येणार आहेत, परंतु या आधीच्या नुकसानीची आणि नवीन बांधकामांच्या सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांकडून व्यक्त केले जात आहे.