जालन्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू आहे. अशातच शिंदे-फडणवीस सरकारने जरांगे यांच्या शिष्टमंडळासह शुक्रवारी (८ सप्टेंबर) रात्री उशिरा मुंबईत बैठका घेतल्या. तसेच अर्जून खोतकर यांच्या मार्फत जरांगे यांच्याकडे बंद लिफाफा पाठवला. त्यावर मनोज जरांगे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. तसेच सरसकट मराठा आरक्षणाची दुरुस्ती झालेली नसल्याचं म्हणत उपोषण सुरूच राहणार असं जाहीर केलं.

मनोज जरांगे म्हणाले, “२००४ च्या जीआरचा आम्हाला काहीही फायदा झाला नाही. ७ सप्टेंबरच्या शासन आदेशात सुधारणा झाली नाही. फेऱ्या होऊ द्या, मीही इथे झोपलेलोच आहे. सरकारने अर्जून खोतकर यांच्याकडे बंद लिफाफ्यात शासन आदेश पाठवला. मात्र, त्यात सरसकट मराठ्यांना आरक्षणाची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे माझं आमरण उपोषण सुरू राहील.”

“खोतकर आमची भूमिका सरकारला कळवतील”

“अर्जून खोतकर आमची भूमिका सरकारला कळवतील आणि त्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करतील. आपल्याला शांततेत आंदोलन करायचं आहे. उग्र आंदोलनाला या आंदोलनाचा पाठिंबा नाही,” असं मत मनोज जरांगेंनी व्यक्त केलं.

“बडतर्फीची एकही कारवाई नाही”

मनोज जरांगे पुढे म्हणाले, “बडतर्फीची एकही कारवाई नाही. केवळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. ज्यांच्यावर कारवाई करायला हवी ते मुंबईत आमच्यासमोर फिरतात. सक्तीची रजा ही कारवाई नाही. इतका अमानुष हल्ला झाल्यावर त्याला सक्तीची रजा पुरेशी नाही.”

हेही वाचा : “दगडफेकीबाबत कट रचल्याची शक्यता, मराठा समाज…”; मनोज जरांगेंचा उल्लेख करत दीपक केसरकरांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यात आले नाही”

“आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ते मागे घेण्याबाबत आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही. उद्या काय होईल माहिती नाही,” असंही जरांगेंनी नमूद केलं.