लोणावळा : मुंबईकरांची आणि मराठा समाज आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी यावे. आरक्षणाची मागणी मान्य करावी. आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही मात्र, आझाद मैदानावरच उपोषण करणार, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यातील सभेत गुरुवारी केला.
जरांगे यांच्या वाकसई चाळ येथील सभेला अडीच ते तीन लाखांचा जनसमुदाय उपस्थित होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागांत समर्थन देण्यासाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज जागोजागी जमल्याने जरांगेंची पदयात्रा वाकसई चाळ येथे दहा तास उशिराने पोहोचली. मराठा समाजाचे आंदोलन शांततेच्या मार्गाने जाणार आहे, असे नमूद करीत जरांगे म्हणाले, की मुंबईत काहीही गडबड, गोंधळ होणार नाही असा शब्द मी समाजाच्या वतीने देतो. ज्या ५४ लाख नागरिकांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना आणि त्यांचे सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे या आमच्या मागणीवर आम्ही ठाम असून सरकारने ही मागणी मान्य करावी.
हेही वाचा >>>सातारा:श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिमेला सुरुवात; यात्रेत हजारो धारकरी सहभागी
चर्चा निष्फळ
सरकारच्या वतीने दोन शिष्टमंडळांनी जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरल्याने जरांगेंची यात्रा दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने निघाली. वाशी येथे गुरुवारी रात्री मुक्काम केल्यानंतर शुक्रवारी (२६ जानेवारी) त्यांची पदयात्रा मुंबईकडे प्रवास सुरू करील. मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावरच आमरण उपोषण करण्यावर जरांगे ठाम आहेत.
महामार्गावर वाहतूककोंडी
मनोज जरांगे यांची पदयात्रा गुरुवारी दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. लोणावळ्यातून वाशीकडे जाताना पोलीस प्रशासनाने आंदोलकांना द्रुतगती मार्गावरून जाऊ न देता जुन्या मार्गाने जाण्याची विनंती केली.
मराठा समाज लाखोंच्या संख्येत मुंबईला फिरायला नाही, तर लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून आरक्षण मागायला चालला आहे. – मनोज जरांगे पाटील