लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : राज्यात मराठा आरक्षणासाठी झालेल्या लढ्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासाठी अध्यादेशाचा मसुदा प्रसिद्ध केल्यामुळे त्याचा राजकीय लाभ मुख्यमंत्री शिंदेचलित शिवसेनेला होणार आहे. तर भाजपला दुहेरी तोटा सहन करावा लागणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
माढा येथे आयोजिलेल्या ओबीसी मेळाव्यात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याचवेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासह इतर मुद्यांवर भाष्य केले. यावेळी ओबीसी चळवळीशी संबंधित ज्योती-क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रमेश बारसकर हे उपस्थित होते. आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जारी केलेला अध्यादेश न्यायालयात टिकेल किंवा टिकणार नाही, हा वादाच विषय आहे. परंतु या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी कुणबी जातीचे पुरावे शोधण्यापासून ते सर्वेक्षण आणि शेवटी अध्यादेशाचा मसुदा प्रसिध्द करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर बाजी मारली आहे. त्यामुळे मराठा नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उभे राहिले आहे. त्याचे स्वरूप आगामी निवडणुकांमध्ये मतदानातून समोर येईल, असा दावाही त्यांनी व्यक्त केला.
आणखी वाचा-‘मराठ्यांच्या तोंडाला पाने पुसली का?’, विरोधकांच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले…
मराठा आरक्षण आंदोलन पेटलेले असताना भाजप ओबीसी घटकांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले. परंतु धर्माच्या नावानृ आम्हांला फसविले जात असल्याची भावना ओबीसींमध्ये वाढली आहे. मराठा आरक्षणाचे श्रेय मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे गेल्यामुळे भाजपमधील मराठा नेतृत्व गर्भगळीत झाले आहे. यातून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजघटकांतून भाजपचा तोटा झाला आहे, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले.