अलिबाग : राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही, कुठल्याही पात्र लाभर्थ्यांना वगळण्यात येणार अशी ग्वाही राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यासंदर्भात त्या माध्यमांशी बोलत होत्या.
सध्या मिळालेला डाटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. अनेक लाभार्थींना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल. यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात. काही पहिल्याच पडताळणीत बाद ठरल्या असतील. आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेला एक वर्ष होत आहे. त्यावेळी 2 कोटी 63 लाख इतकी नोंदणी झाली होती. प्राथमिक पडताळणीमध्ये 10 ते 15 लाख अर्जदार अपात्र ठरले होते. त्यानंतर आम्ही वेगवेगळया विभागाकडून त्यांच्याकडील लाभार्थ्यांची माहिती मागवत होतो. माहिती तंत्रज्ञान विभागाने आम्हाला सर्व विभागाच्या 26 लाख लाभार्थींची माहिती दिली आहे, प्रत्येक जिल्हयाचा जो डेटा आम्हाला देण्यात आला आहे त्याची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गावातील संबंध बिघडतील या कारणाने अंगणवाडी सेविकांनी पडताळणीचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे. यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की ही योजना ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यासाठी राबवत आहोत. शासकीय सेवेत असतानाही या योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांचयाबाबत शासन योग्य निर्णय घेईल पण चुकीचा लाभ कुठे जावू नये यासाठी आम्ही ही पावलं उचलत आहोत. त्यामुळे पडताळणीसाठी येणारया अंगणवाडी सेविकांना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे. वेगवेगळया शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. लाडकी बहीण योजनेचा लाभ एखादी महिला घेत असेल तर आणि तिला अपात्र ठरवले तर तिला दुसरया कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकच्या उत्पन्नामुळे ती निकषात बसत नसेल परंतु चुकीच्या पद्धतीने लाभ कुणाकडे जाता कामा नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.