राहाता : आपल्या सर्वांच्या योगदानामुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आले. लोकांसाठी काम करणारे हे सरकार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून महायुती सरकारने केवळ घोषणा नव्हे तर मदत देण्याची अंमलबजावणी केली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतही तेवढ्याच जोमाने काम करून, महायुतीला विजयी करण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्त्यांचा मेळावा मंत्री विखे यांच्या उपस्थितीत बुधवारी झाला. ज्येष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्यास शिवाजीराव जोंधळे, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, निवृत्ती सांगळे, मच्छिंद्र थेटे, संतोष रोहोम, आर.डी. कदम, रंगनाथ उंबरकर, भाऊ गायकवाड, विनायक बालोटे, कांचन मांढरे, रोहिणी निघुते उपस्थित होते.

विखे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळत आहे. नुकत्याच झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कुठलाही विलंब न करता राज्य सरकारने ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. कालच्या मंत्रीमंडळ बैठकीतही ११ हजार कोटी रुपयांच्या मदतीला मान्यता देण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे म्हणाले की, शिर्डी मतदार संघातही विकासाची प्रक्रिया कुठेही कमी झालेली नाही.

निळवंडे उजव्या कालव्याची प्रतीक्षा अनेक वर्षांची होती. या प्रश्नाची सोडवणूक करून पाणी देता आल्याचे मोठे समाधान आहे. प्रवरा डाव्या आणि उजव्या कालव्यांसाठी दीडशे कोटी रुपयांची उपलब्धता करून दिल्याचे मंत्री विखे म्हणाले. शिर्डी मतदार संघातील युवकांच्या रोजगारासाठी औद्योगिक वसाहतीची सुरुवात गतीने होत असून, अनेक उद्योजक त्या ठिकाणी येवून आता उद्योगाची उभारणी करू लागले आहेत. अतिशय कमी कालावधीत शिर्डीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये या भागातील तरुणांसाठी रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी शाळीग्राम होडगर, आरपीआयचे संतोष रोहोम यांची भाषणे झाली. या मेळाव्यात संगमनेर साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शिंदे, वाघापूरचे माजी उपसरपंच विनोद घोलप, अमृत दूध संस्थेचे संचालक रामभाऊ शिंदे, वाघापूर सोसायटीचे संचालक साहेबराव शिंदे, साईराम राहाणे, शारदा पतसंस्थेचे नानासाहेब शिंदे, दीपक पानसरे, बाबासाहेब शिंदे, संदीप शिंदे, जोर्वे युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ बलसाने यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मंत्री विखे यांनी स्वागत करून, अभिनंदन केले.