Aaditya Thackeray On MNS and UBT Shivsena Alliance : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना एक सूचक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच नुकतंच उद्धव ठाकरे यांनी मनसेशी युती करण्याच्या संदर्भात सूचक भाष्य केलं होतं. ‘महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल’, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. दरम्यान, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर आज आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली आहे. तसेच चंद्रकांत खैरे यांच्या विधानावरही त्यांनी भाष्य केलं असून मनसेशी युतीबाबत उद्धव ठाकरेंनी कोणावर जबाबदारी दिलीये का? यावरही ते बोललेत आहेत.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीबाबत बोलताना मोठं विधान केलं होतं. ठाकरे गट आणि मनसेच्या युतीची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्यावर सोपवल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यांच्या या विधानाबाबत आदित्य ठाकरे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला.

यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या शेजारी उभे असलेल्या अनिल परब यांना विचारलं की उद्धव ठाकरे यांनी खरंच अशी जबाबदारी दिली आहे का? त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी म्हटलं की, “याबाबत चंद्रकांत खैरे यांना फोन करून विचारा. मी तुम्हाला सांगतो की यामध्ये कोण काय बोलतंय? कोणावर काय जबाबदारी आहे? यापेक्षा हे महत्वाचं आहे की आम्ही सतत बोलत आलो आहोत की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसांच्या हितासाठी जे कोणी पक्ष बरोबर यायला तयार आहेत, आम्ही त्यांना बरोबर घेऊन हा लढा देऊ”, असं सूचक भाष्य आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, “अदानी समूह असेल किंवा भाजपा असेल हे मुंबई आणि महाराष्ट्र गिळंकृत करायला निघालेले आहेत. मात्र, अनेक अत्याचाराच्या घटना या महाराष्ट्रात होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी जे कोणते पक्ष लढत आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ठाकरे बंधू एकत्र येण्याची तारीख ठरलीय का?

दरम्यान, ठाकरे बंधू एकत्र येण्याची तारीख ठरलीय का? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलं असता त्यावर त्यांनी अधिक उत्तर देणं टाळलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र कधी येणार का? यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, “ठीक आहे, बघुया, जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला फक्त संदेश नाही तर थेट बातमी देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनामध्ये काहीही संभ्रम नाही. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की संदेश वैगेरे देण्यापेक्षा जी काही बातमी द्यायची ती आम्ही देऊ”, असं सूचक भाष्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.