संगमनेर : संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी मार्गाच्या कामाची, तसेच प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी केली. या पालखीतील वारकऱ्यांची कोणतीही अडचण होणार नाही, याची सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी आणि त्याबाबतचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आषाढी वारीच्या निमिताने दर वर्षी संत निवृत्तिनाथ महाराज देवस्थानची पालखी पंढरपूरला जाताना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे मुक्कामाला थांबते. अनेक वर्षांची ही परंपरा असून, तालुक्यातील भाविकांच्या वतीने या पालखीचे दर वर्षी मनोभावे स्वागत करण्यात येते. मागील वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती. त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संत पालखी मार्ग कामाबाबत जिल्हाधिकारी, तसेच अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांना गांभीर्याने नियोजन करून पालखी येण्यापूर्वीच सर्व व्यवस्था निर्माण करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या.
आमदार खताळ यांनी पारेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थ, अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, अतिरिक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्याम मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, तालुक्याचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, त्र्यंबक गडाख, गणेश गडाख, रावसाहेव गडाख, लक्ष्मण गडाख आदी उपस्थित होते. या वर्षी प्रथमच जलरोधक मंडप उभारला जाणार असून, महायुती सरकारने त्यासाठी पाच लाख रुपये, २ लाख ग्रामपंचायतीकरिता अनुदान, २५० शौचालये आणि स्नानगृहाकरिता २०० युनिट उभारणीसाठी निधीची उपलब्धता करून देण्यात आली आहे.
आरोग्य सेवेबाबत तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने सर्व यंत्रणांनी सज्ज ठेवावेत. पिण्याचे पाणी, वीजपुरवठा सुरळीत राहील, याची दक्षता घ्यावी. मंडप उभारण्यात येणाऱ्या जागांची, तसेच पालखी मार्गावर झालेल्या कामाबाबत बांधकाम विभागाकडून माहिती घेतली. या रस्त्याच्या कामाकरिता मंत्री विखे यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मार्गाचे काम होऊ शकले. उरलेल्या दिवसांत साइडपट्ट्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आमदार अमोल खताळ