महाराष्ट्रातील जमिनी मोठ्या प्रमाणात बळकवल्या जात आहेत. मराठी माणसाच्या हातात काहीही शिल्लक राहणार नाही, अशी टीका मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे मनसेतर्फे सहकार शिबीराचे उदघाटन करत असताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. रायगड जिल्ह्यात शिवडी न्हावा-शेवा सारखा रस्ता होत आहे. यावर बोलत असताना ते म्हणाले, जेव्हा जेव्हा असे मोठे रस्ते झाले, तेव्हा तेव्हा मराठी माणसाच्या हातातून जमिनी गेलेल्या आहेत. कारण आपण बेसावध आहोत. तुटपुंज्या पैशांसाठी आपण जमिनी विकून टाकतो. उद्या रायगड जिल्हा मराठी माणसाच्या हातात राहणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

हे वाचा >> राज ठाकरेंचा महायुती सरकारला टोला, “आत्ताचं सरकार म्हणजे ‘सहारा चळवळ’, आम्ही अडकलोय आम्हाला…”

“रायगडमध्ये विमानतळ होत आहे. मुंबईला जोडणारा रस्ता होत आहे. रस्ता आणि विमानतळ झाल्यानंतर बाहेरच्या राज्यातील लोक येऊन इथल्या जमिनी विकत घेणार, तेही इथल्या लोकांच्या नाकावर टिच्चून”, असे विधान राज ठाकरे यांनी केले. “हळूहळू तुम्ही दुसरी भाषा बोलायला लागणार. कारण ती बाहेरची माणसे तुमच्याशी बोलायची बंद होणार. रायगड जिल्ह्यासाठी मी आताच धोक्याची सूचना देऊन ठेवतो. मराठी बांधवांनी सतर्क राहावे. इथल्या इमारती, जमिनी विकत घेतल्या जात आहेत. ही एकप्रकारची महाराष्ट्राच्या विरोधातली सहकार चळवळ आहे. उद्या तुमच्या हातातून एक एक गोष्टी निसटतील, तेव्हा फक्त पश्चातापाचा हात डोक्यावर मारून घ्यावा लागेल”, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

राज ठाकरे पुढे म्हणाले, “आपल्याकडचे नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशांसाठी वेडे झालेले आहेत. त्यांना तत्त्व कळत नाहीत. त्यांना पाठिचा मणका नाही, स्वाभिमान नाही. आज इकडून तिकडे गेले, उद्या तिकडून इकडे आले, याशिवाय दुसरे काही चालू नाही. घरी गेल्यावर त्यांना कदाचित घरातलेही विचारत असतील आज कुठे आहात? मध्यंतरी मी विधानभवनातील एका कार्यक्रमात गेलो, तेव्हा मला कळेचना कोण कुठल्या पक्षात आहेत. त्यांनी त्यांची मने आणि स्वाभिमान गहाण टाकलेला आहे, पण तुम्ही तो टाकू नका. माझ्या मनसे सैनिकांकडून कधीही स्वाभिमान गहाण टाकला जाणार नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोतीराव फुलेंचा आदर्श घ्या

राज ठाकरे यांनी जमिनीचा मुद्दा समजावून सांगत असताना जोतिराव फुले यांचे उदाहरण दिले. “फुले यांचा उल्लेख करत असताना त्यांनी महिलांना शिक्षण दिले, असे आपण म्हणतो. ते त्यांनी केलेच, पण त्याशिवाय त्यांनी त्यावेळी राज्यातील जमिनी सावकाराच्या घशात जाऊ नये, यासाठी पहिले आंदोलन केले होते”, अशी आठवण राज ठाकरे यांनी करून दिली.