अलिबाग – अलिबाग तालुक्यातील नागाव ला पर्यावरण पुरक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ बनवण्यासाठी वन विभागा आणि नागाव ग्रामपंचायत यांच्या सामंजस्य करार करण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत माथेरान येथे हा करार करण्यात आला.
अलिबाग मधील नागाव हे कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. विस्तीर्ण समुद्र किनारा आणि सागरी जलक्रिडा प्रकारासांठी नागाव हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. आता जागतिक पातळीवर नागावची पर्यटनस्थळ म्हणून ओळख व्हावी, पर्यावरण पुरक विकास व्हावा यासाठी वनविभागाने सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आहे.
जागतिक पातळीवर स्वच्छ, सुंदर समुद्र आणि पर्यावरण पुरक किनाऱ्यांना ब्लू फ्लॅग मानांकन दिले जाते. डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन संस्थे मार्फत हे मानांकन दिले जाते. ३३ निकषांचे मूल्यमापन करून ब्ल्यू फ्लॅग दर्जा दिला जात असतो. पर्यावरण शिक्षण, जल गुणवत्ता, सुरक्षा आणि पर्यावरण व्यवस्थापन तसेच सेवा सुरक्षा, सेवा या घटकांचा यात समावेश असतो. हे मानांकल नागाव समुद्र किनाऱ्याला प्राप्त व्हावे यासाठी वन विभाग आणि ग्रामपंचायत नागाव यांच्याकडून संयुक्त प्रयत्न केले जाणार आहे. या साठीच हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. यावेळी वन विभागाचे वरिष्ट अधिकारी आणि ग्रामपंचयतीच्या सरपंच हर्षदा मयेकर उपस्थित होत्या.
महाराष्ट्र वनविभाग व नागाव ग्रामपंचायतीच्या सामंजस्य करारासाठी अलिबागचे उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी महत्वपुर्ण भुमिका बजावली, तसेच वनविभागाच्या पुर्ण सहकार्याची ग्वाही दिली. या करारा अंतर्गत ग्रामपंचायत व वनविभाग यांच्या संयुक्त विदयमाने स्वच्छता, जैवविविधता संवर्धन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, सुरक्षीतता, आणि पर्यटन सोयीसुविधा यावर विशेष भर दिला जाईल. जर हा करार यशस्वीपणे राबविल्यास नागाव बीच ब्लू फलॅग हे प्रतिष्ठीत आंतराराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळविणारा भारतातील १४ वा आणि महाराष्ट्रातील पहिला समुद्र किनारा ठरेल. ज्यामुळे रायगड जिल्ह्याचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर उंचावेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.