CM Yogi Mumbai Visit : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आजपासून मुंबई दौऱ्यावर आहेत. या दरम्यान ते मुंबईतील उद्योजक आणि उद्योगसमूहांशी भेटी आणि बैठका घेऊन चर्चा करणार आहेत. याशिवाय बॉलिवूडमधील काही दिग्ग्जांशीही त्यांची भेट होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील गुंतवणूक संधी आणि राज्य सरकारकडून त्यांना मिळणाऱ्या विशेष सवलती याबाबत माहिती देऊन उद्योगांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला आहे.
“आता उरलेले उद्योग उत्तर प्रदेशच्या घशात घालण्यासाठी खोके सरकारने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पायघड्या घातल्या आहेत. भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू जनतेने लक्षात घ्यावा.” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
याचबरोबर, “शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे. वेदांता-फॉक्सकॉन हा १.५४ लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पासह इतर महत्वाचे प्रकल्प गुजरातला भेट देऊन महाराष्ट्राचे मोठे आर्थिक नुकसान केले, लाखो तरुणांचे रोजगारही गेले.” असंही नाना पटोले यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ हे आपल्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यात टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, मिहद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समूह, बाँबे डाइंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समूह, एशियन पेंट्स, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारुती सुझुकी, अशोका लेलँड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगपतींशी चर्चा करणार आहेत.