आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोहळ्यादरम्यान या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना रविवारी (१२ जून) घडली आहे. आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळा सुरू असताना पोलिसांनी काही वारकऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज केला असून या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षावर टीका करू लागले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

नाना पटोले म्हणाले, शेकडो वर्ष चालत आलेल्या या वारकरी परंपरेला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने गालबोट लावलं आहे. ज्या पद्धतीने भोळ्याभाबड्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करवण्यात आला. त्या घटनेचा मी काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करतो.

नाना पटोले म्हणाले, वारी ही महाराष्ट्राची पुरोगामी पंरपरा आहे, या परंपरेनं सगळ्या धर्माच्या माणसांना सोबत घेऊन चालण्याचं काम केलं. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याचं काम वारकऱ्यांनी केलं. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम केलं. वारकरी परंपरेनं हे काम केलं. परंतु या परंपरेला संपवण्याचं पाप जातीवादी सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर सुरू झालं. या परंपरेला सरकारने गालबोट लावण्याचं काम केलं. या सरकारचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. त्यामुळे थोडी लाज लज्जा असेल तर या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने करतो.

हे ही वाचा >> आळंदी : “नियोजनाच्या नावाखाली मंदिरात…”, वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्यावरून रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकी घटना काय?

माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी मुख्य मंदिरात गर्दी आणि चेंगराचेंगरी टाळण्यासाठी प्रत्येक दिंडीतील केवळ ७५ वारकऱ्यांनाच आत घेण्याचं देवस्थानाने ठरवलं आहे. तशी विनंती दिंडी मालकांना आणि फडकऱ्यांना आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगेश देसाई यांनी केली आहे. असं असताना काही वारकरी मंदिरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी वारकऱ्यांवर सौम्य लाठीमार केला आहे.