Navneet Rana Critisice Sanjay Raut : निर्विवाद यश मिळाल्यानंतरही महायुतीने सत्ता स्थापन करण्यास दिरंगाई केली आहे. मुख्यमंत्री पदावरून निर्माण झालेल्या पेचामुळे सत्ता स्थापनेही प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्याने आता देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपा नेतृत्त्वाने अद्यापही देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव जाहीर केलं नसलं तरीही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यावरून संजय राऊतांनीही मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सतत भाजपावर आगपाखड करणाऱ्या संजय राऊतांचे सूर आता बदलले आहेत, अशी चर्चा होऊ लागली आहे. यावरून नवनीत राणा यांना विचारले असता त्यांच्याही चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.

नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका

“मी वयाने, अनुभवनाने लहान आहे. मी माजी सैनिकांची मुलगी आहे. बच्चू कडूंनीही माझी लायकी काढली. माजी सैनिकाच्या कुटुंबातील सदस्यांची लायकी काढणाऱ्यांची लायकी जनता जनार्दन काढत असते”, असं नवनीत राणा म्हणाल्या. आज त्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता मुंबईतील सागर बंगल्यावर आल्या होत्या. देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा >> Ajit Pawar on Rohit Pawar : “फुकटचा सल्ला नको”, रोहित पवारांच्या ‘त्या’ मागणीवर अजित पवारांचा टोला!

भाजपा देवेंद्र फडणवीसांनाच मुख्यमंत्री करतील

“आम्ही देवेंद्र फडणवीसांचे सैनिक आहोत. आम्ही भाजपाचे कार्यकर्ता आहोत. अडीच वर्षांपूर्वी फडणवीसांनी जो त्याग केलाय तो त्यांना पुन्हा रिपीट करावा लागणार नाही, अशी अपेक्षा आहे. भाजपा फडणवीसांनाच मुख्यमंत्री करतील, अशी आशा आहे”, असं नवनीत राणा म्हणाल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांची आता दिशाही बदलेल

संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय, त्यामुळे संजय राऊतांचे सूर बदलले आहेत असं वाटतं का? असा प्रश्न विचारताच नवनीत राणा यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. त्यांच्या कपाळावर आठ्या आल्या. त्या म्हणाल्या, “अरे देवा…! कोणी कौतुक केलं? संजय राऊतांनी? मी असं ऐकलंय की वेळेनुसार लोकांचे सूर बदलतात. पण अशा लोकांचेही सूर बदलतात, हे मी पहिल्यांदाच पाहतेय. मला असं वाटतंय की संजय राऊतांचे सूरच नाही तर दिशाही बदलेल.”