अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ‘लिव्ह इन रिलेशन’बाबत मोठं विधान केलं आहे. मी माझ्या संपूर्ण जीवनात कधीही’लिव्ह इन रिलेशन’बाबत ऐकलं नव्हतं. पण आजच्या पिढीकडून हे सगळं ऐकतं आहे. आई-वडील मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. पण तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहतात, अशा आशयाचं विधान नवनीत राणा यांनी केलं. त्या अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलत होत्या.

उपस्थित लोकांना संबोधित करताना नवनीत राणा म्हणाल्या, “मीही याच पिढीची आहे. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ काय असतं? हे मी माझ्या जीवनात कधीही ऐकलं नाही. पण आजच्या पिढीकडून ऐकते की मुलं-मुली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात पाठवतात. तिथे मुली भाड्याच्या घरात मुलांसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. मुलं-मुलांबरोबर लग्न करतात आणि मुली मुलींबरोबर लग्न करत आहेत. ही कुठली परंपरा आपल्या जीवनात आली?”

हेही वाचा- एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात बसणार धक्का? श्रीकांत शिंदेंची होणार उचलबांगडी? भाजपाच्या हालचाली वाढल्या

“मी इन्स्टाग्राम आणि सोशल मीडियावर हे पाहत असते. याचं माझ्या मनात कुठेना कुठे तरी दु:ख आहे. आपल्या तरुण पिढीत ही गोष्ट नेमकी कुठून आली? आपण स्वावलंबी झालो आहोत. पण आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी आपल्या आई-वडिलांनी रक्ताचं पाणी केलं आहे. म्हणून आपण या पदापर्यंत पोहोचलो. थोडे पैसे कमवायलो लागलो म्हणून असं वागायचं… ही आपली संस्कृती नाही. आई-वडिलांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं आहे. आता आपणही समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. देवाने प्रत्येकाला काही ना काही तरी करायला पाठवलं आहे,” असंही नवनीत राणा म्हणाल्या.

हेही वाचा- “अजित पवारांमुळे मंत्रीमंडळ विस्तार लांबला”, अजब कारण देत सदाभाऊ खोत यांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणांनी पुढे नमूद केलं की, समाजाने आपल्याला खूप काही दिलं आहे. समाजाने आपल्याला राहण्याची पद्धत शिकवली. समाजाने आपल्याला नाव दिलं. त्यामुळे समाजाचं आपणही काहीतरी देणं राखतो. आपण समाजासाठी किमान दहा टक्के दिलं तरी खूप झालं, हे करण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.