Chhagan Bhujbal On Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारने मोठं मताधिक्य मिळवत पुन्हा सत्ता स्थापन केली. महायुतीच्या या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचं महायुतीचे नेते सांगतात. एवढंच नाही तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी पुन्हा आमचं असरकार आल्यास लाडक्या बहि‍णींच्या पैशात १५०० रुपयांवरून २१०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, महायुतीचं सरकार सत्तेत येऊन एक महिना होऊन गेला तरी याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आता तर लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष लावण्यात येणार असल्याची चर्चा आहे. अर्जाची छाननी करण्यात येणार असल्याचंही बोललं जात आहे.

यातच काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री कोकाटे यांनी एक मोठं विधान केलं होतं. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा? हे महिलांनी ठरवावं. कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल असं कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर आता राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नेते तथा आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं भाष्य केलं आहे. अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली करण्यात येईल, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “…अन्यथा टॉवरवर चढून मी स्वतः ला संपवून घेणार”, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची संतप्त प्रतिक्रिया

छगन भुजबळ काय म्हणाले?

“योजनेचे नियम काही वेगळे असतात. आता एका घरात दोन महिलांना लाभ देता येत नाही. तसेच एखाद्याच्या घरी चारचाकी गाडी असेल तर त्यांना लाभ देता येणार नाही. मात्र, गरीबांना लाभ मिळायला हवा. असा या योजनेचा उद्देश आहे. पण जे नियमात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून आपलं नाव काढून घेतलं पाहिजे. याबाबत लोकांना अवाहनही केलं पाहिजे. आता योजनेच्या माध्यमातून जे पैसे दिले गेले आहेत, ते पैसे परत मागण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे दिले गेलेले पैसे पुन्हा घेण्यात येऊ नये. मात्र, यापुढे सांगितलं पाहिजे की, नियमात बसत नाही त्यांनी स्वत:हून आपले अर्ज काढून घ्यावीत. त्यानंतर जर त्यांनी आपले नावे काढून घेतले नाही, किंवा अपात्र महिलांनी अर्ज मागे न घेतल्यास दंडासह रक्कम वसुली कररण्यात येईल”, असं इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी कोकाटे काय म्हणाले होते?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना काही दिवसांपूर्वी एक प्रश्न विचारण्यात आला होता. नमो शेतकरी महासन्मान योजना आणि लाडकी बहीण योजना असा कोणता लाभ घेता येईल किंवा दोन्ही योजनेचा लाभ घेता येईल का? तेव्हा कोकाटे यांनी म्हटलं होतं की, “एका वेळी दोन योजनांचा लाभ घेता येत नाही. हा नियम आहे. त्यामुळे महिलांनी हा निर्णय घ्यायचा आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा की नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ घ्यायचा? हे त्यांनी ठरवायचं आहे”, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आज छगन भुजबळ यांनी देखील लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधनावरून वेगवेगळी चर्चा रंगली आहे.