वेदान्त-प्रकल्प गुजरातला वळवल्यावरून महाराष्ट्रातील तापलेलं राजकीय वातावरण आता शांत होताना दिसत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातच संघर्ष सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. भारतीय जनता पार्टी लवकरच नवीन सरकार पाडेल, अशा आशयाचं विधान जयंत पाटलांनी केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल का? असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की, हे सरकार कार्यकाळ तर पूर्ण करणार नाहीच, आता फक्त एवढाच प्रश्न आहे की सरकार बरखास्त कधी करायचं. भारतीय जनता पार्टीच्या कॅल्क्युलेशननुसार जेव्हा गणितं जुळायला लागतील, तेव्हा भाजपाच हे सरकार बरखास्त करेल. त्यादिवशी एकनाथ शिंदेंना आपण किती मोठी चूक केली आहे, हे लक्षात येईल.

हेही वाचा- “होय, मी रामदास कदमांच्या पाया पडलो”, भास्कर जाधवांनी सांगितला प्रसंग, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पण आज यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही. ज्यावेळी हे घडेल तेव्हा आपण यावर बोलू. कार्यकाळ पूर्ण करण्याचा तर प्रश्नच येत नाही. हे सरकार लवकरच कोसळेल. कारण लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भाजपासोबत गेलेले बरेच आमदारही नाराज आहेत. त्यामुळे कधीही काहीही होऊ शकते, म्हणून राज्याच्या प्रशासनादेखील यांचं ऐकायचं थांबवलं आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांही माहीत आहे की हे फार दिवसाचे आपले साथी नाहीत. कधीही जाऊ शकतात. त्यामुळे नवीन सरकारची राज्याच्या प्रशासनावरची पकडही सैल झाली आहे, असंही यंत पाटील यावेळी म्हणाले. ते औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधत होते.