माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यांचा अंतरिम जामीन दिला आहे. आरोग्याच्या कारणास्तव त्यांना जामीन दिला आहे. मागील काही दिवसांपासून मलिक क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार घेत होते. जामीन मिळाल्यानंतर अखेर त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळे आता ते नेमक्या कोणत्या गटात जाणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी सूचक विधान केलं आहे.

आधी नवाब मलिक यांची प्रकृती बरी होऊ द्या. त्यानंतर कोणत्या गटात जायचं? हे तेच ठरवतील. ते कुठेही गेले तरी फार लांब जाणार नाहीत. ते इकडेच राहतील, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं.

हेही वाचा- “शरद पवारांचं बोलणं आणि प्रत्यक्ष कृती…”, युतीत सामील होण्याच्या चर्चेवर बच्चू कडूंचं मोठं विधान

नवाब मलिकांची जामिनावर सुटका झाली आहे, ते कोणत्या गटात सामील होतील? असा प्रश्न विचारला असता छगन भुजबळ म्हणाले, “नवाब मलिकांची आधी प्रकृती तरी बरी होऊ द्या. त्यानंतर कुठे जायचं आणि कुणाबरोबर जायचं? हे तेच ठरवतील. त्यांना मूत्रपिंडाचा फार मोठा आजार बळावला आहे. त्यामुळेच त्यांना दोन महिन्यांचा जामीन मिळाला आहे. त्यांना आधी नीट तरी होऊ द्या, ते बरे झाले तरच राजकारणात काम करू शकतील. त्यानंतर कुठे जायचं? हे तेच ठरवतील. पण ते फार लांब कुठे जाणार नाहीत, ते इकडेच राहतील.”

हेही वाचा- अखेर दीड वर्षानंतर नवाब मलिक यांची सुटका, रुग्णालयातून बाहेर पडताच कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरं तर, छगन भुजबळ हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहेत. दरम्यान, त्यांनी आताच जामिनावर सुटका झालेल्या नवाब मलिक यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ते फार लांब जाणार नाहीत, ते इकडेच राहतील, असं सूचक विधान भुजबळांनी केलं. त्यामुळे आमदार नवाब मलिक हे अजित पवार गटात सहभागी होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.