भाजपा नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या विधानांमुळे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. बीडमधील एका कार्यक्रमात ‘मी सध्या बेरोजगारच आहे’ हे त्यांचे विधान सध्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंकजा मुंडेंना म्हणावं तसं भाजपा महत्त्व देत नाही, त्यांना बाजुला काढण्यात आलं आहे”, असे जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. पक्षातील त्यांचे महत्त्व कमी करण्याचे काम काही दिवसांपासून होत असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.

Video : “सध्या मी बेरोजगारच आहे, त्यामुळे मला…”, पंकजा मुंडेंची मिश्किल टिप्पणी; सोशल ट्रोलिंगवरही केलं भाष्य!

दिवंगत गोपीनाथ मुंडेंनी भाजपाला महाराष्ट्रात वाढवण्यासाठी कष्ट घेतले. त्यांच्या कामांमुळे पंकजा मुंडेंना पाठिंबा मिळत असतो, असे पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाविषयी तानाजी सावंत यांनी केलेलं विधान धक्कादायक असल्याचे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले. ही भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची असावी, तीच भूमिका सावंत मांडत आहेत, असे पाटील म्हणाले आहेत. “राज्यात सत्ताबदल झाल्याने मराठा आरक्षणाची खाज सुटली” या सावंत यांच्या उस्मानाबादेतील वक्तव्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी मास्टर प्लॅन काय? बारामतीतून भाजपा स्टार उमेदवार देणार? बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

जयंत पाटील यांनी गॅस सिलिंडरच्या दरांवरुन सत्ताधारी भाजपावर निशाणा साधला. “सरकारने गॅस सिलिंडर वापरण्यासाठी प्रोत्साहन दिले, त्यानंतर सर्वांनी सिलिंडर घेतल्यानंतर त्यावरील सबसिडी कमी करण्यात आली. सरकार गॅस सिलिंडरचा व्यवसाय करतंय असं वाटायला लागलं आहे”, अशी टीका पाटील यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पक्षातील अंतर्गत विषय आणि इतर चालू घडामोडींबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. येत्या ४ आणि ५ नोव्हेंबरला शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.