Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते, मुंब्रा-कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांचे कडवे विरोधक राहिलेले आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी अनेकदा अजित पवारांवर जहाल टीका केली आहे. काल मुंब्रा-कळव्यात एका जाहीर सभेला संबोधित करत असताना आव्हाड यांनी अजित पवारांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप केला जात आहे. अजित पवार गटाच्या वतीने अनेकांनी पुढे येऊन जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर टीका केली आहे. अजित पवार गट हा पाकिटमारांची टोळी असल्याचे आव्हाड म्हणाले. तसेच हिंमत असेल तर स्वतःचा वेगळा पक्ष काढून निवडणुकीला सामोरे जायला हवे होते, असेही ते म्हणाले.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

मुंब्र्यात एका सभेत बोलत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, अजित पवारांचा गट हा पाकिटमारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची औलाद होता, तर मग तुम्ही स्वतःचे वेगळे चिन्ह घेऊन निवडणूक लढवून दाखवायला हवी होती. मग आम्ही तुम्हाला मर्द समजले असते. ज्या काकांनी देशभरात स्वतःचा पक्ष पसरवला आणि वाढवला. त्या पक्षाला तुम्ही माझं माझं म्हणत हिसकावून घेतलं. पण जनतेला सत्य माहीत आहे.

अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना छगन भुजबळ म्हणाले, “डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी याआधीही अनेकदा चुकीच्या शब्दांचा वापर केला होता, ज्यामुळे ते अडचणीत आले होते. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहीजे. माझा त्यांना सल्ला आहे की, शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहीजे. आपण कुणाला चोर म्हणतो, कुणाला पाकिटमार म्हणतो, याचा त्यांनी विचार केला पाहीजे. तुमच्याबरोबर जे २० ते २५ वर्ष राहिले, त्यांना सर्वांना हे विधान लागू होते.”

हे वाचा >> “बाळासाहेबांनी कधीच निवडणूक लढविली नव्हती, राज ठाकरेंनी…”, माहीम विधानसभेबाबत सदा सरवणकर काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारला

जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाचा समाचार घेताना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या महिला नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या की, आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे. आव्हाड हे घरभेदी आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात दुरावा निर्माण करणाऱ्यांमध्ये प्रथमस्थानी जितेंद्र आव्हाड होते. ही बिनकामाची लोकं लोकप्रतिनिधी असूनही कलंक आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय कामं केली आहेत. मर्द, माल असे शब्द निवडणुकीत वापरले जात आहेत. कामावर कधी निवडणूक लढविली जाणार? असाही प्रश्न रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.