संगमनेर : ‘ज्ञानोबा- तुकोबा’चा उद्घोष आणि टाळ मृदंगाच्या गजरात त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचे संगमनेर तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यातील पारेगाव बुद्रुक येथे अश्विनाथ महाराज गडावर पालखी पोहोचताच आमदार अमोल खताळ आणि प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी पालखीचे पुष्पहार अर्पण करून स्वागत केले.
पारेगाव ग्रामस्थांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. आमदार खताळ यांनी स्वतः पालखीतील बैलजोडीचा दोर धरून, गळ्यात वीणा घालत, त्यांच्या पत्नी नीलम यांनी डोईवर तुळशी वृंदावन घेऊन विठ्ठल-नामाचा जयघोष करत सहभागी झाल्या. पालखी सोहळ्याचे प्रमुख ॲड. सोमनाथ घोटेकर यांनी आमदार खताळ आणि नीलम खताळ यांचा गुलाबपुष्प, श्रीफळ, संत निवृत्ती महाराज प्रतिमा आणि ज्ञानेश्वरी देऊन सन्मान केला.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. सुरेश घोलप, भाजप नेते भीमराज चत्तर, विठ्ठल घोरपडे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ राहणे, सरपंच संदीप देशमुख, साहेबराव घुगे, रावसाहेब गडाख, सुरेश दळवी, किशोर गडाख, भाऊपाटील गडाख, अमोल दिघे आदी उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी अडीच कोटींचा निधी
मागील वर्षी आलेल्या अडचणी लक्षात घेता, यंदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे जिल्हा नियोजनच्या बैठकीत निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून वारकऱ्यांसाठी आरोग्य, निवास आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी प्रमुखांनीही शासनाच्या या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. – आमदार अमोल खताळ.