अलिबाग : Mumbai Goa highway accident गणेशोत्सवासाठी गणेशभक्तांना कोकणात घेऊन जाणाऱ्या एसटी बसला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला, तर बसमधील ३७ प्रवासी जखमी झाले. यापैकी ८ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्यांच्यावर माणगाव, पनवेल व मुंबई येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात माणगाव तालुक्यातील रेपोली गावाजवळ पहाटे ४:३० च्या सुमारास घडला.
रत्नागिरीतील राजापूर येथे गणेशोत्सवासाठी स्पेशल एस टी बस मुंबई येथून सोडण्यात आली होती. एकूण ३८ प्रवासी या बसमधून प्रवास करत होते. मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरून बस रेपोली गावाजवळ आली असताना पुढे असणाऱ्या ट्रेलरवर आपटली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला. बसमधील सर्वच प्रवाशांना किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. एकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला, तर ८ जणांना अधिक उपचारार्थ पनवेल व मुंबई येथील रुग्णालयांत पाठविण्यात आले आहे.
अपघाताचे वृत्त समजताच महामार्गावर पेट्रोलिंग करणारे पोलीस, माणगाव डी वाय एस पी गोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण नावले व अन्य कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. पोलीस व स्थानिक ग्रामस्थ यांच्या समयसुचकतेमुळे जखमींना योग्य वेळेत रुग्णालयात दाखल करणे सोयीचे झाले. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
अवजड वाहनांची वाहतूक सुरूच
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. पण तरीही मोठ मोठे कंटेनर व अवजड वाहने बिनदिक्कत महामार्गावर चालत असल्याचे पाहावयास मिळत आहे. शनिवारी अवघ्या एका दिवसात रायगड पोलिसांनी १०७ तर आर टी ओ विभागाने २७ जणांवर कारवाई केली. रेपोली येथे बसच्या झालेल्या अपघातासदेखील कंटेनर जबाबदार असल्याचे निदर्शनास आले आहे, वाहतूक बंदी असतानाही हा कंटेनर मुंबईकडून गोव्याकडे चालला असताना बस त्यावर पाठीमागून आदळली.