ठार मारण्याची धमकी दिल्यानंतरही जोशी (भटक्या) समाज पंचायतकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात येथील अण्णा हिंगमिरे यांनी आवाज उठविण्याची हिंमत केल्यानंतर आता छळामुळे वर्षांनुवर्षे पिचलेली अनेक कुटुंबे आता पंचायतीविरोधात पुढे येऊ लागले आहेत. निफाड तालुक्यातील विंचूर येथील जाधव कुंटुंबीय हे त्यापैकीच एक आहे.भिका रंगनाथ जाधव यांच्या छाया या मुलीचे बाळू धुमाळ यांच्याशी लग्न झाल्यानंतर जात पंचायतीच्या हस्तक्षेपास सुरूवात झाली. पंचायतीच्या एका सदस्याने आपल्या नातेवाईक महिलेला त्यांच्या घरात स्थान मिळवून देण्यासाठी छाया धुमाळ यांना हरतऱ्हेने त्रास देण्यास सुरूवात केली. आपणांस का त्रास देण्यात येत आहे, असा प्रश्न पंचायतीच्या प्रमुखांना विचारण्याचे धाडस छाया धुमाळ यांनी केल्यानंतर त्या गरोदर असतानाही पंचायतीने त्यांना घराबाहेर काढले. त्यांना फारकत घेण्यास भाग पाडले. त्यानंतर त्या वडिलांकडे परत आल्यावर पंचायतीने त्यांनाही वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. गावातील त्यांच्या घराचाही पंचायतीने ताबा घेतल्याने जाधव कुटुंबीयांस गावाबाहेर राहावे लागत आहे. या कुटुंबाशी कोणालाही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. भिका जाधव यांनी दोन वेळा समाजातील कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना मारहाण करण्यात आली. दुसरीकडे छाया धुमाळ यांच्यामागेही पंचायतीच्या छळाचा ससेमिरा सुरूच राहिला. मुलगा सचिनचा विवाह जमविण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाल्यावर पंचायतीने विवाह जमू नये म्हणून आडकाठी आणणे सुरू केले. त्यामुळे जमणारा विवाह दोन-तीन वेळा रद्द झाला. मुलीकडील मंडळींकडे पंचायतीकडून या कुटुंबाची निंदा केली जात असे. या कुटुंबांशी संबंध प्रस्थापित केल्यास तुम्हालाही समाजाबाहेर पडावे लागेल, अशी धमकी देण्यात येत असे. विंचूर येथे असलेले सचिन धुमाळ यांचे हॉटेलचीही तोडफोड करण्यात आली. पंच मंडळींपैकी शंकर इंगळे, शिवाजी शिंदे (लासलगाव), प्रकाश धुमाळ (पाचोरा), विष्णू गरड (लासलगाव) यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात काही वर्षांपूर्वी विंचूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला ; मात्र कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप गणपत जाधव, सचिन धुमाळ व छाया धुमाळ यांनी केला आहे. वीस वर्षांपासून पंचायतीचा जाच आपण सहन करीत असून, हिंगमिरे यांनी केलेल्या तक्रारींमुळे आम्हांलाही पंचायतीविरोधात आवाज उठविण्याचे बळ मिळाले. आपणही नाशिकच्या पोलिसांकडे तक्रार देणार असून, आमच्या संपूर्ण कुटुंबीयांना न्याय मिळावा, अशी भावना छाया धुमाळ यांनी ‘लोकसत्ता’कडे व्यक्त केली.