सोलापूर : संपूर्ण आयुष्य जंगलात राहून जंगलातील निसर्ग, वन्य पशू-पक्ष्यांचा संशोधक वृत्तीने बारकाईने अभ्यास करणारे ज्येष्ठ लेखक, पद्मश्री, ‘अरण्यऋषी’ मारुती भुजंगराव चितमपल्ली यांच्या पार्थिवावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मारुती चितमपल्ली (वय ९३) यांनी वृद्धापकाळाने काल बुधवारी रात्री सोलापुरात अखेरचा श्वास घेतला. हे वृत्त कळताच विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, साहित्य व कला, पर्यावरण क्षेत्रातील मंडळींनी शोक व्यक्त केला. अक्कलकोट रस्त्यावरील हेरिटेज मणिधारी सोसायटीतील निवासस्थानी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी गर्दी केली होती.
अंत्ययात्रा तुळजापूर रस्त्यावरील श्री रूपाभवानी हिंदू स्मशानभूमीत पोहोचली, तेव्हा शासनातर्फे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार आणि जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. पोलीस पथकाने शोकधून वाजवून आणि बंदुकांमधून हवेत तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली. पार्थिव चितेवर ठेवण्यात आले असता, पालकमंत्री जयकुमार गोरे हे दाखल होऊन त्यांनीही चितमपल्ली यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. या वेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, पद्मशाली ज्ञाती समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी आदी उपस्थित होते.
दरम्यान चितमपल्ली यांच्या निधनामुळे सोलापुरात हिराचंद नेमचंद वाचनालयात शुक्रवारी (२० जून) सायंकाळी सहा वाजता शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी ही माहिती दिली.
कलाविष्कार आणि पक्ष्यांचे आवाज
अंत्ययात्रेत हलगी, सनई, तुतारी, संबळ वाद्ये वाजविणाऱ्या कलावंतांनीही कलाविष्कार घडवून चितमपल्ली यांना अनोखी मानवंदना दिली. अक्कलकोट तालुक्यातील चुंगी गावच्या कलावंतांनी नारळ फोडून श्रद्धांजली वाहिली. विविध पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढणारे कलावंत अंबादास कनकट्टी यांनी मोर, कोकिळा, मैना, कावळा, चिमणी अशा किती तरी पक्ष्यांचे आवाज काढून चितमपल्ली यांना आदरांजली वाहिली.
निसर्गप्रेमींचा थोर मार्गदर्शक गमावला
अरण्यऋषी, पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. चितमपल्ली यांच्या रूपाने देशातल्या निसर्गप्रेमींनी एक थोर मार्गदर्शक गमावला आहे. झाडांच्या सावलीत आणि पुस्तकांच्या सान्निध्यात त्यांनी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले. पक्ष्यांचे बोलणे, प्राण्यांचे जगणे, झाडांचे संवेदन आणि जंगलाची धडधड यांना ग्रंथरूप देणारा ऋषितुल्य लेखक आज काळाच्या पडद्याआड गेल्याचे दुःख आहे. त्यांच्या लेखणीने अनेक पिढ्यांना निसर्गाशी संवाद साधायला शिकवले, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली. ज्येष्ठ लेखक अच्युत गोडबोले, इंद्रजित भालेराव आणि इतरांनी समाजमाध्यमातून चितमपल्ली यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले.