पंढरपूर : वीर आणि उजनी धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग कमी झाला आहे. वीर धरणातून नीरा नदीत १९७७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे उजनी धरणातून चंद्रभागा नदीपात्रात ४१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाला असला, तरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, येथील चंद्रभागा नदीत यापूर्वी दोन्ही धरणांतून सोडण्यात आलेले पाणी पोहोचल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. भाविकांनी स्नान करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वीर धरणातून मंगळवारी रात्री ११ वाजता ३०५१३ क्युसेक विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू केला होता. नीरेचे हे पाणी पुढे अकलूज येथून भीमा म्हणजेच चंद्रभागा नदीला येऊन मिसळते. या पाण्याचा विसर्ग कमी केला असून, बुधवारी वीर धरणातून दुपारी ४ वाजता १९७७५ क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सोडण्यात आल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. तर, उजनी धरणातून मंगळवारी रात्री १२ वाजता ५१ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग चंद्रभागा नदीच्या पात्रात सोडण्यात आला होता. येथेही विसर्ग कमी केला असून, बुधवारी दुपारी चार वाजता उजनीतून जवळपास ४१ हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. येथील चंद्रभागा नदीपात्रात ६४ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
चंद्रभागा नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. यात गुरुवारी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आषाढी यात्रेला पायी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढू लागली आहे. येथे येऊन स्नान, दर्शन करून पायी दिंडीत सहभागी होतात. सध्या नदीचे पाणी वाढत आहे. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जीवरक्षक दलाची तुकडी तैनात आहे. भाविकांनी खोल नदीपात्रात स्नान करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आषाढी एकादशीचा सोहळा ६ जुलै रोजी आहे. या दरम्यान पूरस्थिती ओढावू नये म्हणून धरणातून मोठ्या प्रमाणत विसर्ग सुरू केला आहे. जेणेकरून जर मोठा पाऊस झाला, तर धरणात पाण्याची साठवण करता येईल, अशा सूचना पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.