परभणी : आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध प्रश्नांवर सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाच दिवस उलटून गेले. तरीही राज्य शासनाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आक्रमक झालेल्या ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी येथे राज्य शासनाचा निषेध करत मुंडन आंदोलन केले. आंदोलनात काही शेतकरीही सहभागी झाले होते.
राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी तसेच हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील माल खरेदी करण्यात यावा, दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन मिळावे, घरकुलासाठी शहर व ग्रामीण या दोन्ही भागांत पाच लाख रुपये अनुदान देण्यात यावे, पेरणी ते कापणीच्या कामांचा शेतीतील सर्व खर्च मनरेगा मार्फत करावा, या प्रमुख मागणीसह अन्यही काही मागण्या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाधी स्थळ गुरुकुंज मोझरी येथे सुरू असलेल्या या आंदोलनास प्रहारच्या येथील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. बेमुदत अन्नत्याग आंदोलनामध्ये ‘प्रहार जनशक्ती’ पक्षाचे परभणी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, दीपक खुडे, अशोक मस्के यांच्यासह १२ पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
बच्चु कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा पाच दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही राज्य शासन दखल घेत नसल्याने अत्यंत आक्रमक झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करीत राज्य शासनाचा निषेध म्हणून मुंडन आंदोलन केले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी व प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंडन करून राज्य शासनाचा निषेध केला. राज्य सरकारने कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी अन्यथा यापुढे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांनी दिला. या आंदोलनात शहरप्रमुख अंकुश गिरी, परभणी तालुकाप्रमुख उद्धव गरुड, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शिवहार सोनटक्के, वसंत शिंदे कुणाल गायकवाड, रामेश्वर पुरी आदींसह शेतकरी, कार्यकर्ते सहभागी झाले.