प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी पक्ष महाविकास आघाडीत येण्यास उत्सूक आहे. परंतु, मविआतील प्रमुख पक्ष आणि वंचितमध्ये अद्याप जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. तसेच महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम (कॉमन मिनिमम प्रोग्राम) ठरलेला नाही. तसेच जागावाटपावरून चार पक्षांमध्ये रस्सीखेच चालू असताना ही आघाडी होणारच नाही असा सूर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे. प्रकाश आंबेडकर सातत्याने अवाजवी मागण्या करत असल्याचं बोललं जात आहे. अशातच आंबेडकर यांनी आज (१ मार्च) स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने राज्यातल्या ४८ पैकी २७ जागांवर आमची ताकद असल्याचं पत्र मविआ नेत्यांना दिलं होतं. त्यामुळे वंचितच्या मविआ प्रवेशाबाबत अनेकांच्या मनात साशंकता आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत जागावाटपासाठी ठेवलेल्या अटी लक्षात घेता चारही पक्षांमध्ये एकमत होण्याबाबत महाविकास आघाडीचे नेते साशंक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतले नेते प्रकाश आंबेडकर स्वतंत्र लढल्यास त्याचा महाविकास आघाडीला किती फटका बसू शकतो याचा अंदाज घेऊ लागले आहेत.

महाविकास आघाडीत शिवसेनेचा ठाकरे गट सर्वाधिक जागा मिळाव्या यासाठी प्रयत्न करत आहे. ठाकरे गटाला १८ पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, अशा प्रकारची वक्तव्ये ठाकरे गटातील नेत्यांकडून ऐकायला मिळत आहेत. त्याचबरोबर शरद पवार गट आणि काँग्रेसलाही अधिकाधिक जागा हव्या आहेत. यावर वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, फुटलेल्या पक्षांनी आधी त्यांची ताकद पाहावी. आपली ताकद पाहूनच आघाडीत जागा मागाव्या. उद्या असं होऊ नये की, कोंबडी आम्ही शिजवली. त्यानंतर आम्हाला फक्त कोंबडीचं मुंडकं दिलं आणि उरलेली कोंबडी इतर लोक घेऊन गेले. आम्ही तसं होऊ देणार नाही. मी आमच्या लोकांना सांगितलं आहे, आपण शेवटच्या क्षणापर्यंत थांबू. मिळून मिसळून आणि सन्मानाने कोंबडी खाऊ.

चार पक्षांमध्ये ताळमेळ नाही?

२ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे महाविकास आघाडीची बैठक पार पडली होती. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. या आघाडीला एक महिना उलटला तरी अद्याप चार पक्षांमध्ये ताळमेळ असल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही. प्रकाश आंबेडकर अजूनही स्वबळावर लढण्याची भाषा बोलत आहेत. तर मविआ नेत्यांनी लोकसभेच्या जागांबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.