पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर यांसारख्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना फोडाफोडी करून सहा महिन्यांसाठी त्यांना मंत्रिपद देणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेला राजकीय भ्रष्टाचार आहे. लोकप्रतिनिधींच्या फोडाफोडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पक्षांतरासंदर्भात करण्यात आलेल्या ९१ व्या घटनादुरुस्तीचे उल्लंघन आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. याविरोधात काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेसचे विखे आणि काही दिवसांपूर्वी शिवसेनेत आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे क्षीरसागर नेत्यांना मंत्रिपद दिल्यामुळे चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. इतर पक्ष सोडण्यासाठी आणि आपल्या पक्षात येण्याकरिता त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपद देणे ही लाच आहे, असा आरोपही त्यांनी केला.
माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या कार्यकाळात २००३ मध्ये लोकप्रतिनिधी फोडाफोडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून पक्षांतरासंदर्भात ९१ वी घटनादुरुस्ती करण्यात आली. १ जानेवारी २००४ पासून ही तरतूद लागू आहे. त्यातील तरतुदीनुसार एखाद्या पक्षाकडून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला त्याचा आमदार, खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या पक्षात मंत्री होता येत नाही. विखे आणि क्षीरसागर हे म्हणूनच मंत्रिपदी राहू शकत नाहीत. त्यांना मंत्री करणे हा घटनेचा भंग आहे.
रिपाइंचे अविनाश महातेकर हे निवडून आलेले नाहीत. तरीही त्यांना मंत्रिपद देण्यात आले असून ते निवडून येणे आवश्यक आहे. सहा महिन्यांत ते कसे शक्य आहे, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी विखे, क्षीरसागर यांना मंत्री करताना सर्व बाबी तपासण्यात आल्या असल्याचा दावा विधिमंडळात केला होता, याची आठवणही चव्हाण यांनी करून दिली.