राहाता : जनावरांसाठी गवत कापताना शेतकऱ्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी उंबरी बाळापूर शिवारातील कारवाडी येथे घडली. जखमी शेतकऱ्याला स्थानिकांनी घुलेवाडी येथे उपचारासाठी दाखल केले.
मच्छिंद्र दगडू कालेकर (वय ५६) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. बाळापूर शिवारातील कारवाडी येथील मच्छिंद्र कालेकर हे सकाळी ८.३० च्या सुमारास शेतात जनावरांसाठी गिनी गवत आणण्यासाठी गेले होते. त्यांच्या समवेत असलेली पत्नी आणि मुलगा जीवन शेतातील इतर काम करत होते. कालेकर स्वतः खाली वाकून गिनी गवत तोडत होते.
शिकारीच्या शोधात दबा धरून बसलेल्या बिबट्याला खाली वाकलेले मच्छिंद्र कालेकर हे सावज वाटल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला केला. परंतु, पत्नी व मुलाने प्रसंगावधान राखत आरडाओरडा करत धाव घेतल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली.
माहिती मिळताच संदीप होडगर, किरण कालेकर, सचिन चंद, समाधान होडगर, जीवन कालेकर, नितीन होडगर आदींनी जखमी कालेकर यांना घुलेवाडी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कालेकर यांच्या डोक्याला आणि नाकाला दुखापत झाली असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. कारवाडी परिसरात बिबट्याच्या पशुधनावर हल्ल्याची मालिकाच सुरू आहे. या बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
बिबट्या जेरबंद करण्याची मागणी
अनेक दिवसांपासून कारवाडी परिसरात बिबट्याची दहशत आहे. भर दिवसा कालेकर यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने हा बिबट्या तत्काळ जेरबंद करावा, कालेकर यांच्या उपचारांचा खर्च वन विभागाने द्यावा आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खेमनर (जानकर) यांनी केली आहे.