राजस्थानमध्ये सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना समर्थन देणाऱ्या ८० हून अधिक आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे एकत्रित राजीनामा सादर केला आहे. सर्व आमदारांनी रविवारी रात्री उशिरा विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी त्यांच्या निवासस्थानी राजीनामे सादर केली आहेत. ज्या आमदारांनी राजीनामे दिले आहेत, ते सर्व आमदार अशोक गेहलोत यांच्या अधिकृत निवासस्थानी जाणार आहेत. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरले आहेत. ‘एक व्यक्ती, एक पद’ या नियमामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागणार आहे. त्यामुळे विधिमंडळ गटाचा नवा नेता निवडण्यासाठी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावण्यात आली होती. पक्षाचे प्रभारी अजय माकन आणि पक्षनिरीक्षक म्हणून मल्लिकार्जुन खरगेही बैठकीला उपस्थित होते. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही या बैठकीला हजर झाले होते. या बैठकीमध्ये केवळ नेतानिवडीचे सर्वाधिकार केंद्रीय नेतृत्वाला देण्याची औपचारिकता पार पाडली जाणार असल्याचे गेहलोत यांनी स्वत: जाहीर केले होते. मात्र बैठकीपूर्वी गेहलोत समर्थक आमदारांनी राजीनामास्त्र उगारले आहे.

हेही वाचा- मोठी बातमी‍! राजस्थानमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे ८० आमदार देणार राजीनामा

गेहलोत समर्थक आमदार बैठकीकडे फिरकले नाहीत. त्याऐवजी ते मंत्री शांती धारिवाल यांच्या बंगल्यावर जमून बसमधून विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या घरी गेले. रात्री उशिरा काँग्रेसच्या ८२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. २०२० साली सचिन पायलट यांनी पक्षाअंतर्गत बंड केलं होतं. या काळात सरकारला पाठिंबा देणारा उमेदवारच राजस्थानचा पुढील मुख्यमंत्री असावा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.

हेही वाचा- “आपण आत्महत्या करायची नाही, पण…” भाजपावर टीका करताना शरद पवारांचं विधान

याच कारणातून सर्व आमदारांनी रविवारी रात्री मंत्री शांती धारिवाल यांच्या निवास्थानी जमून सर्व राजीनामे गोळा केले. यानंतर सर्व आमदार बसमधून विधानसभा अध्यक्ष सी. पी जोशी यांच्या निवास्थानी दाखल झाले. रात्री उशिरा जवळपास ८२ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती मिळत आहे.