Ramdas Athawale : “विधानसभेला राज ठाकरे महायुतीसह नव्हते म्हणूनच आमच्या जास्त जागा…”; रामदास आठवलेंचा टोला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यानंतर या चर्चांना काहीसा पूर्णविराम मिळाल्याची स्थिती आहे. महापालिका निवडणुका जाहीर होणं बाकी आहे. लवकरच त्या जाहीर होतील मात्र आता रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना महायुतीत घेऊ नये असं म्हटलं आहे. विधानसभेला राज ठाकरे बरोबर नव्हते म्हणूनच आम्हाला जास्त जागा मिळाल्या असा टोला आठवलेंनी लगावला आहे.

विधानसभेला राज ठाकरे बरोबर नव्हते म्हणूनच जास्त जागा आल्या-आठवले

लोकसभेला राज ठाकरे आमच्याबरोबर म्हणजे महायुती बरोबर होते पण तेव्हा काही फायदा झाला नाही. विधानसभेला राज ठाकरे आमच्याबरोबर नव्हते त्यामुळे आमच्या जास्त जागा निवडून आल्या. राज ठाकरे यांची भूमिका रोज बदलणारी आहे. राज ठाकरेंना बरोबर घेऊन काही फायदा नाही हे माझं आधीपासूनचं मत आहे. आरपीआय बरोबर असताना महायुतीला राज ठाकरेंची आवश्यकता नाही. राज ठाकरे पूर्णपणे आमच्या बरोबर येतील असं अजिबात नाही. कारण स्वबळावर लढण्याचीच त्यांची भूमिका अनेकदा राहिली आहे. महायुतीत त्यांना घेऊ नये असं आजही माझं मत आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरीही फरक पडणार नाही-आठवले

मुंबईत महायुती स्ट्राँग आहे. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरीही मुंबई ही बहुभाषिक आहे. मराठी दलित आणि इतर दलितही अधिक आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरीही काही होणार नाही. यंदा मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे असंही रामदास आठवले म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणं अद्याप बाकी आहे. दरम्यान मुंबईत चुरशीची लढत होणार आहे हे दिसून येतंच आहे. अशात जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली तर या युतीला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळू शकतो. आता नेमकं काय होणार ते पाहणंही महत्त्वाचं असेल. मात्र तूर्तास रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना बरोबर घेऊन काहीही फायदा होणार नाही असं म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची जी भेट झाली त्यात गैर काही नाही. दोन नेत्यांची भेट होऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे. आता रामदास आठवले जे बोलले त्यावरुन मनसेची काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे.