अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना यंदा भारतीय जनता पार्टीकडून अमरावती लोकसभेचं तिकीट हवं होतं. परंतु, त्यांच्या उमेदवारीच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. सर्वोच्च न्यायालयात चालू असलेलं बनावट जातप्रमाणपत्राचं प्रकरण आणि त्यानंतर भाजपाच्या मित्रपक्षांकडून राणा यांच्या उमेदवारीस होत असलेल्या विरोधामुळे नवनीत राणा यांना भाजपाकडून लोकसभेचं तिकीट मिळणार की नाही याबाबत संभ्रमाचं वातावरण होतं. परंतु, भारतीय जनता पार्टीने हा संभ्रम दूर केला आहे. पक्षातील पदाधिकारी आणि एनडीएतील घटक पक्षांचा, नेत्यांचा विरोध जुगारून भाजपाने नवनीत राणा यांना अमरावतीतून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. भाजपाने काही वेळापूर्वी लोकसभा उमेदवारांची सातवी जादी जाहीर केली असून यामध्ये नवनीत राणा यांचं नाव आहे.

नवनीत कौर राणा यांना अमरावतीत शिवसेनेकडून विरोध होत होता. येथील माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनीदेखील राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. राणा यांना उमेदवारी मिळाल्यास आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी ठाम भूमिका अडसूळ यांनी घेतली होती. तसेच अमरावतीमधील एनडीएतील घटक पक्ष असलेल्या प्रहार जशक्ती पार्टीचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांचाही राणा यांना विरोध आहे. बच्चू कडू म्हणाले होते की, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की ज्या नवनीत राणा यांनी आम्हाला अपमानित केलं त्यांचा प्रचार आम्ही करणार नाही. कार्यकर्त्यांची मानसिकताच नाही. राजकारणात झीरो झालो तरीही चालेल पण इतकी शरणागती पत्करणार नाही. काहीही झालं तरी राणांचा प्रचार करायचा नाही ही कार्यकर्त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे मतदारसंघात बच्चू कडू, आनंदराव अडसूळ, शिवसेना आणि प्रहारची समजूत काढणं भाजपा आणि नवनीत राणा यांच्यासमोर मोठं आव्हान आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि त्यांचे पती तथा बडनेराचे आमदार रवी राणा हे सातत्याने बच्चू कडूंवर आणि बच्चू कडू हे राणा दाम्पत्यावर टीका करत आहेत. परंतु, पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळताच रवी राणा यांचे सूर नरमल्याचं पाहायला मिळत आहे. रवी राणा यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी बच्चू कडू यांना विनंती केली आहे की, त्यांनी आगामी निवडणुकीत नवनीत राणा यांना आशीर्वाद द्यावा.

रवी राणा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवनीत राणांवर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अमरावतीच्या जनतेला न्याय देण्यासाठी त्यांनी नवनीत राणा यांची निवड केली. त्यासाठी मी अमरावतीच्या जनतेकडून त्यांचे आभार व्यक्त करतो. नवनीत राणा यांनी गेल्या पाच वर्षांत भाजपाची बाजू मांडली आहे. त्यामुळेच देशाच्या हितासाठी पंतप्रधान मोदींनी नवनीत राणा यांची निवड केली आहे.

हे ही वाचा >> “मला खात्री आहे, ती माणसं…”, प्रचारावेळी राडा करणाऱ्यांबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य; मनोज जरांगेंचा उल्लेख करत म्हणाल्या…

रवी राणा काय म्हणाले?

आमदार रवी राणा म्हणाले, अमरावती लोकसभेबाबत बोलायचं झाल्यास कोणत्याही स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा नवनीत राणांच्या उमेदवारीला विरोध नाही. प्रसारमाध्यमं कसल्या बातम्या दाखवत आहेत त्याची मला माहिती नाही. सर्वजण आमच्याबरोबरच आहेत. आम्ही एनडीएतील सर्व पक्ष जोमाने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात काम करणार आहोत. मी एनडीएमधील घटक पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो, मी बच्चू कडू आणि त्यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीसमोर हात जोडून विनंती करतो की, आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे आहेत. त्यासाठीच तुम्ही नवनीत राणा यांना आशीर्वाद द्या.