स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि नेते रविकांत तुपकर यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टींच्या नेतृत्व आणि भूमिकेबद्दल आक्षेप घेतल्याने ८ जुलैला शिस्तपालन समितीची बैठक बोलावण्यात आली होती. पण, या बैठकीला रविकांत तुपकर यांनी हजेरी लावली नाही. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत रविकांत तुपकर यांना म्हणणे मांडण्याची वेळ देण्यात आली आहे. यावर रविकांत तुपकर यांनी भाष्य केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

रविकांत तुपकर म्हणाले, “बैठकीला येणार नसल्याचं मी अगोदरच कळवलं होतं. त्याचे पुरावेही माझ्याकडं आहेत. माझे नेतृत्वाबद्दल असलेले आक्षेप पाच वर्षापासून सतत सांगत आहे. याबाबत अनेक बैठका झाल्या आहेत. त्यामुळे आता अंमलबजावणी करावी. १५ ऑगस्टपर्यंत म्हणणे मांडावे, असा अधिकृत निरोप मला आला नाही.”

“माझा जिल्ह्यातील किंवा राज्यातील कोणत्याही कार्यकर्त्यांशी वाद नाही. नेतृत्वाच्या भूमिकेबद्दल माझा आक्षेप असल्याचं वारंवार सांगतोय. पण, विषयांतर करण्यासाठी माझा जिल्ह्यातील नेत्यांशी वाद असल्याचं सांगितलं जातं,” असं रविकांत तुपकर यांनी म्हटलं.

हेही वाचा : “…हा अहंकार बरोबर नाही”, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकरांमध्ये जुंपली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुपकरांची भूमिका चळवळीसाठी घातक आहे, असं राजू शेट्टींनी म्हटल्याबाबत प्रश्न विचारल्यावर रविकांत तुपकर म्हणाले, “शेतकरी संघटना लोकशाहीवादी आहे. तर, प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि व्यक्त होण्याच्या अधिकार आहे. ही संघटना वाढवण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही केलं आहे. मी भूमिका मांडणे चळवळीच्या दृष्टीने घातक आहे, तर आम्हाला विश्वासात न घेता दौरे करणे हे सुद्धा चळवळीला घातक आहे.”