मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा उपोषणाला बसले होते तेव्हा राज्यात अनेक ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याचबरोबर त्यांच्या बीड शहरातील घरावर दगडफेक झाली. जयदत्त क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावरील हल्ल्यापाठोपाठ आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावरही दगडफेक झाली, त्यांचं घर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या जाळपोळीवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा या जाळपोळीचा उल्लेख करून राज्यातील जनतेला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी क्षीरसागर यांच्या घर आणि कार्यालयावरील हल्ल्यावरून मराठा आंदोलकांवर हल्लाबोल केला आहे. भुजबळ यांनी बीडमधील जाळपोळीच्या घटनांमागे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक असल्याचा आरोप अनेकदा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला, आमदार रोहित पवार म्हणाले, या जाळपोळीच्या घटनांमागे सत्तेतले लोक आहेत.

हे ही वाचा >> “बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवा, त्याआधी…”, मनोज जरांगेंचा राज्य सरकारला सल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदार रोहित पवार म्हणाले, बीडमधील जाळपोळीमागे सत्तेत असणाऱ्या एका शक्तीशाली व्यक्तीचा हात होता. मराठा आणि ओबीसी समाजांमधील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बीडमध्ये जाळपोळ झाली त्याबद्दल आम्हाला असं वाटतं की, आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय द्वेषातून तसेच आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी येत्या जानेवारी महिन्यापासून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे मी राज्यातल्या सर्व गावांमधील ग्रामस्थांना विनंती करतो की महाराष्ट्र शांत ठेवणं गरजेचं आहे आणि तेच सामान्य लोकांच्या हिताचं आहे.