Sambit Patra on RCB Victory Parade Stampede : बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघाच्या विजयी यात्रेवेळी (व्हिक्ट्री परेड) झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेवरून कर्नाटकमधील राजकारण तापलं आहे. या घटनेवरून विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आहेत. भाजपाने या दुर्घटनेबद्दल ‘सरकारचं मोठं अपयश’ व ‘राजकीय लालसा’ असा उल्लेख केला आहे. भाजपाने म्हटलं आहे की “ही केवळ चेंगराचेंगरी नव्हती, तर मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत कलहामुळे निर्माण झालेली सरकारनिर्मित दुर्घटना होती”.

भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही टीका केली आहे. ते म्हणाले, “राहुल गांधी दररोज भारतीय लष्कर व पंतप्रधान नरेंद्र मोदींची थट्टा उडवत आहेत. मात्र, आता त्यांचं सरकार असलेल्या राज्यात एक दुर्घटना होऊन त्यात अनेक लोक ठार झालेले असताना त्यांनी यावर चकार शब्द काढलेला नाही. आता राहुल गांधी कुठे आहेत? राहुल गांधी यांनी या घटनेची दखल घेत कारवाई करावी. त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा राजीनामा घ्यावा”.

“तिथे तीन लाख लोक जमलेच कसे?”

संबित पात्रा म्हणाले, “या संपूर्ण दुर्घटनेची नैतिक जबाबदारी घेऊन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच डी. के. शिवकुमार यांनी जनतेची माफी मागावी. मुळात त्या ठिकाणी ३ लाख लोक कसे काय दाखल झाले? याप्रश्नाचं उत्तर द्यावं. इतक्या लोकांना तिथे जाण्याची परवानगी कोणी दिली? याची उत्तरं जनतेला मिळायला हवीत. पोलिसांनी परवानगी दिली नव्हती तरी देखील ही विजयी यात्रा कशी व कोणी काढली?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लोक मरत असताना उत्सव सुरू होता”

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, “चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर लोक मरत होते आणि आतमध्ये विजयी जल्लोष केला जात होता. अजूनही ५० जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी काहीजण गंभीर जखमी आहेत. ही कर्नाटक सरकारसाठी शरमेची बाब आहे. अशाच एका चेंगराचेंगरी प्रकरणामुळे टॉलिवूड अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली होती. मग या प्रकरणात डी. के. शिवकुमार व सिद्धरामय्या यांच्यावर कारवाई का केली नाही?”