राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (अजित पवार गट) सुनील तटकरे यांनी दावा केला आहे की, “ऑगस्ट २०२० मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री अशोक चव्हाण हे तिघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटायला दिल्लीला गेले होते. त्या भेटीनंतर शिवसेनेत चर्चा होती की आपण आता भाजपाबरोबर जायला हवं. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनीच राष्ट्रवादीबरोबरच्या बैठकीत याबाबत माहिती दिली होती.” तटकरे यांच्या या दाव्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, सुनील तटकरे खोटं बोलत आहेत. आम्ही आमच्या पक्षातली चर्चा राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन का सांगू? उलट मोदींबरोबरच्या बैठकीत काय झालं? हे उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा सांगितलं आहे. अनेक मुलाखतींमध्येदेखील सांगितलं आहे. त्यामुळे तटकरेंनी ही खोटी माहिती देऊ काही गौप्यस्फोट वगैरे केलेला नाही.

संजय राऊत म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर अजित पवार आणि अशोक चव्हाणदेखील होते. ती बैठक झाल्यावर मोदी आणि आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणखी काही काळ बसले. त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा आढावा घेतला. त्यावेळी मोदींच्या बोलण्यातून असा कल दिसत होता की, त्यांना असं वाटतंय, शिवसेनेने भाजपाबरोबर परत यावं. एकंदरित त्यांचा तसा कल होता. उद्धव ठाकरे यांनी बैठक संपवून बाहेर आल्यावर आम्हाला ही गोष्ट सांगितली. त्यावर आमच्या पक्षात चर्चादेखील झाली. कारण आमच्या पक्षात लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. मोदींचा कल उद्धव ठाकरे यांनी आमच्या पक्षातील लोकांना सांगितला. परंतु, उद्धव ठाकरे यांच्यासह आमच्या सर्वांची हीच भूमिका होती की, त्यांच्याबरोबर जायचं नाही.” संजय राऊत टीव्ही ९ मराठीच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत होते.

आमची सर्वांची भूमिका होती की, ज्या पक्षाने आपल्याला फसवलं आहे. जे लोक आमचा पक्ष संपवायला निघाले होते, आमचा पक्ष संपवण्यासाठी ज्या लोकांनी इतकं मोठं कारस्थान केलं, त्यांच्याबरोबर परत जायचं नाही, अशी साधकबाधक चर्चा आम्ही केली. आत्ता याक्षणीसुद्धा दिल्लीतले अनेक नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जाळं फेकायचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना परत एकदा एकत्र येऊ, बसून चर्चा करू असं बोलत आहेत. ते आम्हाला म्हणत आहेत की, आमच्याकडून चुका झाल्या आहेत त्या आम्ही दुरुस्त करू. परंतु, आम्ही त्यावर कुठलीही प्रतिक्रिया देत नाही.

हे ही वाचा >> मविआचा वंचितबरोबरच्या युतीचा पोपट मेलाय? संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीत काम करतोय आणि शेवटपर्यंत याच लोकांबरोबर काम करत राहू. आम्हीसुद्धा नितीश कुमार यांच्यासारख्या पलट्या मारल्या तर आमच्या नेतृत्वावर कोण विश्वास ठेवेल? लोकांचा विश्वास महत्त्वाचा आहे. आम्ही जो विचार घेतला आहे तो अर्धवट सोडून चालणार नाही. तो विचार तसाच सोडून आम्ही पुढे जाणार नाही. आम्ही भाजपाबरोबर २५ वर्षे युतीत होतो. आम्ही त्यांचा अनुभव घेतला आहे. त्यांनी आमचा पक्ष फोडला. चिन्ह ताब्यात घेतलंय आणि आमच्या लोकांना नादाला लावलं. परंतु, नादाला लावलेली माणसं फार काळ राहत नाहीत. ते लोक लगेच दुसऱ्या नादाला लागतात. आज या तमाशाला जा, उद्या त्या तमाशाला जा, असा त्यांचा खेळ असतो.