औरंगजेबाचा फोटो स्टेटसवर ठेवल्याप्रकरणी कोल्हापुरात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हिंदुत्त्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. संबंधितांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी आज शिंदे फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे. “शिंदे फडणवीस सरकारच्या काळात औरंगजेबाचे फोटो कसे नाचवले कसे जातात?” असा सवाल विचारतच हे तुमच्या सरकारचे अपयश आहे, असंही संजय राऊत म्हणाले. संजय राऊत आज संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“महाराष्ट्राच्या काही भागात, कोल्हापूरात दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संभाजीनगरलाही हीच परिस्थिती निर्माण झाली होती. आज कोल्हापूरच्या रस्त्यावर हिंदूत्त्वावादी संघटना उतरल्या आहेत. काही तरुणांनी वादग्रस्त स्टेटस ठेवला, औरंगजेबाचा फोटो ठेवला त्यातून ही दंगल उसळली असं चित्र निर्माण झालंय. मी संभाजीनगरला बसून बोलतोय. याच मातीत आपण औरंगजेबाला गाडलं. हीच ती भूमी जिथे औरंगजेबाला गाडलं. औरंगजेबाचे कोणी भक्त असतील आणि औरंगजेबाचे फोटो नाचवत असतील तर त्यांना महाराष्ट्रात काय देशात राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी पाकिस्तानाच निघून जावं, ही शिवसेनेचे आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आम्ही आजही ठेवली आहे”, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

हेही वाचा >> “मला हे स्पष्टपणे दिसतंय की…”, औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून फडणवीसांचा विरोधकांना इशारा; म्हणाले, “हा योगायोग…”

“फक्त निवडणुकांसाठी, राजकारणासाठी हिंदूत्त्व निर्माण करायचं, तणाव निर्माण करायचा आणि महाराष्ट्राची शांतता भंग करायची. ज्या लोकांनी हा स्टेटस ठेवला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे दाखल केले पाहिजेत, ती हिंमत तुम्ही दाखवायला पाहिजे. जर तुम्ही स्वतःला शुद्ध हिंदुत्त्ववादी म्हणता. मग त्यांचं सरकार असताना अशाप्रकारची औरंगजेबाची फोटो नाचवण्याची, फोटो स्टेटसला ठेवण्याची हिंमत कशी करू शकतात. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचं सरकार हिंदुत्त्ववादी आहे. कडवट हिंदुत्त्ववादी आहे. हे चालणार नाही, ते चालणार नाही, अमुक सहन करणार नाही, तमुक सहन करणार नाही. मग या शिंदे फडणवीस सरकारमध्ये औरंगजेबाचे फोटो नाचवले कसे जातात? हे तुमच्या सरकारचं अपयश नाही का? की हे सगळं तुम्हीच घडवून आणताय का? त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. हिंदुत्त्ववाद आम्हाला माहितेय”, असंही संजय राऊत म्हणाले.

डॉ.कुरुळकरविरोधातही मोर्चे काढा

“औरंगजेबाचा द्वेष आणि राग करतोय, त्याच्याविरोधात मोर्चे काढतो तर याच संघटनांनी पुण्यात डॉ. कुरुळकर ज्याने पाकिस्तानला आपली गुपितं विकली. त्याच्याविरोधातही मोर्चे काढायला पाहिजे. हा औरंगजेबाइतकाच विषय गंभीर होता. संघाचे काही लोक पाकिस्तानशी हातमिळवणी करतात. देशातील गुपितं विकली जातात आणि ट्रॅपमध्ये सापडली जातात”, अशी टीकाही त्यांनी केली.

सरकारच्या पायाखालची वाळू सरकतेय

“या राज्यात तणाव राहू नये, शांतता राहावी या राज्यात सर्व जाती धर्मात सर्वांना समान न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. पण या राज्यात सरकारच्या पायाखालची वाळू सरकतेय. ताबडतोब या गुन्हेगारांवर कठोरातील कठोर कारवाई केली पाहिजे”, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut criticized shinde fadnavis government over hindutva and kolhapur aurangazeb whats app status incident sgk
First published on: 07-06-2023 at 11:32 IST