संत तुकाराम महाराजांची पालखी बुधवारी सायंकाळी पंधरीच्या वाटेवरील अखेरच्या मुक्कामी वाखरी येथे पोहोचली. अखंड हरिनामाचा गजर आणि विठुरायाच्या दर्शनाची लागलेली वैष्णवांना ओढ, त्या ओढीने कंठातून सुटणाऱ्या अभंगांतूनही पांडुरंगाच्या भेटीची आर्त जाणवल्याशिवाय राहिली नाही.
बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरी, वाऱ्याच्या थंडगार लहरी अंगावर झेलत, सोहळा दुपारच्या विश्रांतीसाठी व न्याहरीसाठी पिराची कुरोली येथे विसावला. या वेळी ग्रामस्थांनी व येथील भजनी मंडळांनी सोहळ्याचे स्वागत केले. ही पालखी बाजीराव विहीर येथे सोहळा उभ्या रिंगणासाठी विसावला. त्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पालखी मार्गावरील दुसरे उभे रिंगण भक्तिरसात चिंब होऊन पार पडले. तत्पूर्वी येथे माउलींच्या पालखी सोहळ्याचे रिंगण होऊन तो सोहळा पुढे सरकण्याच्या तयारीत असताना संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तेथे दाखल झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या दोन संतांची भेट पंढरीत दाखल होण्यापूर्वी येथे झाली. पाऊस झाल्यामुळे बाजीराव विहीर परिसरात वाट चिखलाची लागली होती. हा चिखल वैष्णवांनी एकमेकांच्या अंगावर भक्तिभावाने फेकत चिखलाचे खेळ खेळले. रिंगणसोहळ्यानंतर चिखल तुडवित सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. संत जनाबाई चिखलातून वाट काढीत पंढरीला जाताना तिचा विठुराया तिच्या प्रत्येक पावलावर सोबत होता. दरम्यान, बुधवारी संतांची मांदियाळी वाखरीत दाखल झाली आहे.