सातारा : ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी सातारा शहराची निवड जाहीर होताच त्याचे शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. संमेलनाच्या आयोजनाचा बहुमान साताऱ्यास चौथ्यांदा मिळत आहे. ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाने सातारा शहराची निवड जाहीर केली. साताऱ्याच्या निवडीचे हे वृत्त समजताच त्याचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या पुढाकाराने मराठी साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेने या संमेलनासाठी महामंडळाकडे निमंत्रण दिले होते. त्यानुसार निवड समितीने शनिवारी सातारा येथे येऊन मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, विनोद कुलकर्णी व इतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. साताऱ्याबरोबरच कोल्हापूर, इचलकरंजी, औदुंबर येथूनही निमंत्रण आले होते. अखेर महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत साताऱ्याच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

संमेलन स्थळासाठी साताऱ्याची निवड झाल्याचे वृत्त धडकताच सर्वत्र आनंद व्यक्त करत स्वागत करण्यात आले. शहरात मोठा जल्लोष करण्यात आला. साताऱ्यात आजवर तीन संमेलने झाली आहेत. १९०५ मध्ये सातारा येथे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक रघुनाथ पांडुरंग करंदीकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. या वेळी सातारा जिल्हा सांगलीसह एकत्रित होता. त्यानंतर सातारा जिल्हा स्वतंत्र झाल्यावर सातारा जिल्ह्यात १९६२ मध्ये झालेल्या संमेलनाचे अध्यक्ष होते न. वि. गाडगीळ. १९९३ मध्ये सातारा शहरात झालेल्या संमेलनाध्यक्षपदी विद्याधर गोखले होते.

सातारा शहरात यापूर्वी १९९३ मध्ये ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. तत्कालीन मंत्री स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले त्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. तर विद्याधर गोखले संमेलनाध्यक्ष होते. या संमेलनात मराठी भाषेतील शुद्धता आणि अशुद्धता यावर चर्चा झाली होती.

आता तब्बल ३२ वर्षांनंतर सातारा शहराला पुन्हा एकदा साहित्य संमेलनाचा मान मिळत आहे. योगायोग असा, की हे संमेलन अभयसिंहराजे यांचे सुपुत्र आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पार पडत आहे.

सातारा जिल्ह्यातील संमेलने

कराड येथे १९७५ साली झालेल्या संमेलनाचे अध्यक्षा ज्येष्ठ लेखिका, संशोधक, विदुषी दुर्गा भागवत होत्या. यानंतर २००३ मध्ये कराड (अध्यक्ष : सुभाष भेंडे) तर २००९ मध्ये महाबळेश्वर (अध्यक्ष : आनंद यादव) अशी संमेलने पार पडली. मात्र यातील महाबळेश्वर संमेलनास यादव अनुपस्थित राहिले. यापैकी सन १९७५ चे कराड आणि सन २००९ चे महाबळेश्वर येथील संमेलने विविध मुद्द्यांनी गाजली. सन १९७५ च्या संमेलनावेळी देशात आणीबाणी लागू झालेली होती. या वेळी विचार, भाषण आणि लेखन स्वातंत्र्यावर बंधने आली होती. या संमेलनाच्या अध्यक्षा साहित्यिका दुर्गा भागवत या अतिशय स्पष्टवक्त्या म्हणून सर्वत्र प्रसिद्ध होत्या. तर स्वागताध्यक्ष होते आणीबाणी लादणाऱ्या केंद्र सरकारमधील वजनदार नेते, परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाण. त्यामुळे या संमेलनातही आणीबाणीविरोधी सूर उमटले. राजकीय नेत्यांना संमेलनाच्या व्यासपीठावर कशाला घ्यायचे हा वाद त्याचवेळी सुरू झाला. यावेळी यशवंतरावांनी व्यासपीठ नम्रपणे नाकारले तर दुर्गाबाईंनी त्यांच्या उपस्थितीत आणीबाणी, त्यातील विचार, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील बंदीचा जाहीर निषेध नोंदवला. जिल्ह्यात २००९ मध्ये महाबळेश्वर येथे झालेले संमेलन त्याचे अध्यक्ष आनंद यादव यांच्या अनुपस्थितीने गाजले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान सातारा शहराला दिल्याबद्दल मी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आणि सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. शताब्दीच्या उंबरठ्यावर असलेले हे संमेलन ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण होण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू. जगभरातील तमाम मराठी रसिकांना मी या संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी आताच निमंत्रण देतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा, मावळा फाऊंडेशन, महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह सुनीताराजे पवार, शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि सातारकर हे कार्य स्वतःच्या घरचे असल्याप्रमाणे करतील. मी सातारा येथे संमेलन घेण्याचा शब्द सातारकरांना दिला होता, तो आज पूर्ण झाला आहे. संमेलन देखणे आणि दिमाखदार होईल, यात तिळमात्र शंका नाही.शिवेंद्रसिंहराजे भोसले,सार्वजनिक बांधकाममंत्री, महाराष्ट्र राज्य