सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसलेंचा धक्कादायक पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील उदयनराजे भोसलेंचा पराभव करत जायंट किलर ठरले आहेत. आपल्या विजयावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांना दगा दिल्यानेच उदयनराजेंचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या विजयाचं श्रेय शरद पवार आणि सामान्य जनतेला दिलं आहे, शरद पवारांनी महाराष्ट्र पालथा घातल्यानेच विजय झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

श्रीनिवास पाटील यांनी म्हटलं आहे की, “ही निवडणूक लोकांनीच हातात घेतली होती. मला पहिल्या दिवसापासून पाठिंबा मिळत होता. त्यामुळे विश्वास वाढला होता. पवारांनी पावसात भिजत केलेल्या भाषणामुळे पवार, राष्ट्रवादीसंबंधी सहानुभूतीची एक लाट निर्माण झाली होती”.

सामान्य, तरुण, वयस्कर लोकांनी निवडणूक हातात घेतली आणि भरघोस मतदान करत मला विजयी केल्याचं श्रीनिवास पाटील यांनी सांगितलं आहे. एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला अंदाज फोल ठरला असल्याचं सांगताना उदयनराजे राष्ट्रवादीत राहिले असते तर भविष्य आणखी उज्ज्वल असतं असंही ते म्हणाले.

दरम्यान याआधी शरद पवार यांनी साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाल्याचं म्हणत उदयनराजे भोसले यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला होता. खासदारकीचा राजीनामा दिल्याने सातऱ्यात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. भाजपाने उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली होती, तर राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवलं होतं. विशेष म्हणजे धक्कादायकपणे उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला आहे.

शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, “साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न राखणाऱ्यांचा पराभव झाला आहे. कोणी चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचं समर्थन केलं नाही हे लोकांनी दाखवून दिलं आहे. सत्ता जाते, सत्ता येते मात्र पाय जमिनीवरच ठेवावे लागतात. सत्तेचा उन्माद जनतेला आवडत नाही हे या निकालातून स्पष्ट झालं आहे”. यावेळी शरद पवार यांनी आपण साताऱ्याला जाऊन आपण जनतेचे आभार मानणार आहोत असं सांगितलं.

“श्रीनिवास पाटील हे एकेकाळचे संसदेचे सदस्य होते. एका राज्याचं राज्यपाल पद त्यांनी सांभाळलं म्हणूनच आम्ही त्यांना उमेदवारी दिली. सातारच्या जनतेने चांगल्या मतांनी त्यांना निवडून दिलं त्याबद्दल सातारकरांचा आभारी आहे,” असंही शरद पवार म्हटलं आहे.