सातारा : मुसळधार पावासाने महाबळेश्वरमधील वेण्णा तलाव शनिवारी भरून वाहू लागला आहे. गिरीस्थळांचा जीवनदायिनी असणारा हा तलाव भरल्याने महाबळेश्वर व पाचगणी शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे. गेल्या २४ तासात महाबळेश्वरमध्ये ७३ मि.मी. पावसाची नोंद झाली आली.

मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाला आज काहीसा उतार पडला आहे. मात्र ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरूच होती. डोंगर माथ्यावरून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ग्रामीण भागातील रस्ते काही ठिकाणी खचले, वाहून गेल्याच्या घटना घडल्या. जोरदार पावसाने ओढे, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शहरात पावसाची संततधार सुरू असल्याने नदी, नाले व ओढ्यांची पाणीपातळी वाढली आहे. शहराचा पिण्याच्या पाण्याचा स्रोत असणारा वेण्णा लेकही भरला असून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

वेण्णा तलावामधून महाबळेश्वर व पाचगणीला पाणी पुरवठा केला जातो. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने दोन्ही शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वेण्णा लेक भरल्याने पर्यटकांनी याठिकाणी गर्दी केली होती.

मध्यम -लघु प्रकल्प शंभर टक्के

सातारा जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खटाव, माण तालुक्यातील चार मध्यम व १६ लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत. हे धरण हे द्वारविरहित आहेत. या धरणामध्ये विसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये येणाऱ्या पावसामुळे व त्यामुळे धरणामध्ये येणारी आवक अनियंत्रितपणे धरणाखालील नदी पात्रामध्ये चालू होऊ शकतो.

लघु पाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरल्याने या तालुका परिसरातील व धरणाखालील नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रालगत जाऊ नये. तसेच संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांना नदीमधील अनियंत्रित विसर्गाबाबत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यामध्ये सातारा तालुक्यातील कुमठे व ठोसेघर लघु प्रकल्प (माण)आंधळी, रानंद मध्यम प्रकल्प, पिंगळी, ढाकणी, लोधवडे, गंगोती, जांभुळणी, महाबळेश्वरवाडी लघु प्रकल्प (कोरेगाव), अरबवाडी, हिवरे लघु प्रकल्प (खटाव) नेर, येरळवाडी मध्यम प्रकल्प, दरूज, शिरसवडी, मायणी, डांभेवाडी, सातेवाडी,येळीव लघु प्रकल्प असे जिल्ह्यातील चार मध्यम व १६ लघु प्रकल्प शंभर टक्के क्षमतेने भरलेले आहेत. या धरणाखालील नदीकाठच्या ग्रामस्थांनी नदीपात्रालगत जाऊ नये असे आवाहन कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग, सातारा यांनी आवाहन केले आहे.